विहिरींनी गाठला तळ

विहिरींनी गाठला तळ

05515
जयसिंगपूर: शहर व परिसरातील विहिरींनी गाठलेला तळ.
-------------
विहिरींनी गाठला तळ
पिके करपू लागली; हताश शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे

जयसिंगपूर, ता.२६ : शहर व परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाळा तोंडावर असतानाच शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. मात्र, विहिरीला पाणीच नसल्याने हताशपणे करपणारी पिके पाहण्याचे दुर्दैव शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. ऊस पिकाची वाढ खुंटली असून विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतामधील ऊस करपू लागला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
तालुक्यात खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. मात्र दमदार वळीव झाला नसल्याने या कामातही म्हणावी अशी गती दिसत नाही. यावर्षी उन्हाची तीव्रता चांगलीच आहे. गतवर्षी वळीवाने चांगली हजेरी लावल्यामुळे खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेगाने सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र तसे चित्र दिसत नाही.
शेतीच्या पाण्यावर उपसा बंदीचे संकट आल्यानंतर शेतकऱ्यांनी संघटीतपणे याला विरोध दर्शवला होता. यानंतर महावितरणने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी सकारात्मक भूमिका घेतली. महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनीची तहान वाढली आहे. नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना काही प्रमाणात पाणी मिळत असले तरी विहिरींवर अवलंबून असणाऱ्या शेतीतील पीके अडचणीत आली आहेत. रोज दोन-तीन तास मोटर चालेल इतकाच पाणी साठा विहिरींमध्ये शिल्लक आहे. उन्हाच्या तीव्रतेत पाण्याचे हे प्रमाण अत्यल्प मानले जात आहे. दुसरीकडे यावर्षी वळीव पावसाअभावी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. परिणामी झऱ्यांच्या पाण्यावरच पिके तग धरून आहेत. पाच-सहा महिन्यांचा ऊसदेखील आज करपू लागला आहे. आणखी पंधरा दिवस अशी स्थिती राहिली तर ऊस पूर्णपणे करपणार आहे. त्यामुळे खोडवा ऊसाला दोन हजार रुपये दराप्रमाणे चाऱ्यासाठी विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
....
भाजीपाला पडतोय पिवळा
विहिरीवर अवलंबून असणाऱ्या भाजपाला पिकालाही धोका निर्माण झाला आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने वाढत्या उष्म्याने भाजीपाल्याच्या पानांचा रंग बदलू लागला आहे. पाण्यामुळे हिरवेगार असणारा भाजपाला पिवळा पडू लागला आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेला खर्चही निघेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
....

पाऊस पडेना, पाणी पुरेना
वळीव पावसाने दडी मारल्याने शहर व परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागून राहिल्या आहेत. पावसाअभावी शेती पिकांना पाणी पुरत नसल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.
....

विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या उसाची वाढ खुंटली आहे. पावसाळ्यापर्यंत तरी पिके तग धरणार का ही चिंता सतावत आहे. दमदार वळीवाअभावी विहिरींनी तळ गाठला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ही स्थिती अधिक गंभीर आहे. पाऊस लांबला तर पिके हातची जाणार आहेत.

-संदीप खामकर, ऊस उत्पादक शेतकरी, जयसिंगपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com