पिवळे सोने झाले मातीमोल

पिवळे सोने झाले मातीमोल

फाईल फोटो
...

शेतकऱ्यांचे पिवळे सोने झाले मातीमोल

सोयाबीनचा हेक्टरी खर्च ६ हजारः दर मात्र क्विंटलला केवळ साडेचार हजार रुपये


कुंडलिक पाटील, सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे, ता.२७ः खरिपाच्या तोंडावर जिल्ह्यासह राज्यात शेतकऱ्यांचे पिवळे सोने मातीमोल झाले आहे. सोयाबीनला क्विंटलला साडेचार हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने दरावर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन या नगदी पिकाची शेती करत आहेत. सोयाबीन लागवडीतून शेतकऱ्यांना रोख पैसे मिळू लागले. तीन ते चार महिन्यां पीक आणि कमी कालावधीत चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेत असतात.
राज्यात सोयाबीनचे ४९ लाख हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात ४२ हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असते. सरासरी २१ क्विंटल हेक्टरी उत्पादन होते. जिल्ह्यात सुमारे एक लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होते. मागील हंगामातील सोयाबीन अनेक शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवले आहे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
करोना काळात सोयाबीनला १० ते ११ हजारांपर्यंत दर होता. गेल्या हंगामात ७ हजार सरासरी दर होता. यंदा मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामांना सुरुवात झाली तरी समाधानकारक दर मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

केंद्र शासनाने परदेशातून सोयाबीन व खाद्यतेल आयात केल्यामुळे तेलाचे व सोयाबीनचे दर पडले आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील महिन्याभरापासून सोयाबीनचे दर ५००० च्या वर सरकत नसल्याने बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे. बाजारात सोयाबीनला किमान ४४७० ते कमाल ५०४० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मागील महिन्याभरापासून सोयाबीनचे दर पाच हजाराच्या आसपास स्थिर झाले आहेत.
...

साठवणूक ठरली अडचणीची ...

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवून ठेवले आहे. मात्र अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव,काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यातच उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. प्रतिक्विंटल किमान ६ हजार रुपये खर्च आल्याचे शेतकरी सांगतात. यंदा, दर मात्र ५ हजाराच्या आसपास मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे पुढील हंगामात सोयाबीनच्या पेऱ्यात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

...

‘सोयाबीनचा दर कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी मागील हंगामातील सोयाबीन असल्यास व्यवस्थितपणे साठवणूक करून ठेवावे. पाऊस उशिरा सुरू होईल असा अंदाज आहे. यामुळे सोयाबीनला दर येईल.

दत्तात्रय दिवेकर, जिल्हा कृषी अधीक्षक
...


‘गेल्या हंगामातील २० क्विंटल सोयाबीन शिल्लक आहे. दर पडल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. विक्री न केल्यामुळे खरीप हंगामासाठी पैसे नाहीत.
शिवाजी मोरे, कोगे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com