रात्रीच जागणं

रात्रीच जागणं

भाग अकरावा
-------------
79906
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी धर्मशाळेत रात्री उशिरानंतरही पर्यटकांची अशी गर्दी असते.

निवासाच्या शोधात पर्यटकांची धावाधाव..!
रात्री-अपरात्री हाल; यात्री निवासांच्या अपुऱ्या संख्येमुळे होतेय गैरसोय
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : नव्या काळात वाहतुकीच्या नव्या सुविधांमुळे पर्यटन व तीर्थार्टनाची व्याप्ती वाढली, तशी बहुतेक धार्मिक व पर्यटनस्थळी बारमाही गर्दी वाढली. रोजगार व आर्थिक उलाढालीला गती लाभली. सर्वसामान्य वर्ग वर्षातून दोन-तीन वेळा पर्यटनास बाहेर पडू लागला. असा देशभरातील पर्यटकांचा कोल्हापुरात रात्री- अपरात्रीही राबता आहे. यातील काही पर्यटकांना यात्री निवास आधार ठरली, तर बहुतांशीसाठी यात्री निवासांची अपुरी संख्या गैरसोयीचे कारण ठरत आहे. त्यामुळे रात्री आलेल्या पर्यटकांना निवासाच्या शोधात फिरावे लागते.
मंगळवारी अंबाबाई देवी मंदिर रात्री साडेदहाला बंद झाले. तरीही पर्यटकांच्या गाड्या येत होत्या. पहाटे किंवा सकाळी दर्शन घेऊन पर्यटनास पुढे निघायचा बेत करून पर्यटक रात्रीचा मुक्काम निश्चित करत होते. ज्यांनी यापूर्वी ऑनलाईन बुकींग केले होते ते पर्यटक हॉटेलवर राहायला गेले; मात्र १००० ते २५०० हजारांचे भाडे भरून रूम घेणे शक्य नसलेला वर्ग मोठा होता. यात विजापूरवरून दोन ट्रॅक्स भरून कौटुंबिक पर्यटक भवानी मंडपात आले. एकावेळी वीस जणांना राहण्यासाठी स्वस्तातील जागा हवी होती. प्रवासात त्यांना उशीर झाल्याने ते रात्री अकराच्या सुमारास कोल्हापुरात आले. तेव्हा मंदिर बंद झाले होते. कोल्हापुरात मुक्काम, जोतिबा दर्शन, गणपतीपुळे बघून पुन्हा ते विजापूराला जाणार होते. त्यांनी बिंदू चौक, शिवाजी पुतळा ते मंदिरपर्यंत खोल्यांची चौकशी सुरू केली. याच वेळी मराठवाड्यातून दोन चारचाकी गाड्यांतून आलेले भाविक ताराबाई रोडवर रूम शोधत होते.
ताराबाई रोडवर महालक्ष्मी भक्त निवासात काहींची सोय झाली, तर काहीजण आणखी पर्याय शोधत होते. गल्लीतील यात्री निवासात रूम दाखवण्यासाठी बाहेर दहा-बारा एजंट थांबून होते. ‘रूम पाहिजे काय, स्वस्तात देतो, रूम बघून घ्या, चला’ अशी आरोळी देत होते. पर्यटकांना यात्री निवासात घेऊन जात होते. बार्गेनिंगमध्ये कोणाला पाचशेत, कोणाला हजारात रूम मिळत होती, तर कोणास तेही भाडे जास्त वाटत असल्याने ते बसस्थानकाकडे निघून जात होते.
याच वेळी टेंबे रोडजवळ गुजरातवरून ५० वर भाविक घेऊन बस आली. त्यांची गाडी वाटेत बंद पडल्याने त्यांना कोल्हापुरात येण्यास विलंब झाला. त्यांना बजेटमध्ये हॉल हवा होता. चार-पाच हॉलमध्ये यापूर्वीच भाविक वस्तीला थांबले होते. बजेटमधील हॉल शोधून सापडला नाही. त्यांनी रस्त्याकडेला थांबून, शेगड्या मांडून स्वयंपाक व खाणं आवरून घेतलं. रात्री बाराच्या सुमारास गाडी कणेरीकडे मुक्काम करण्यास गेली. रोज अशा दोन ते सात गाड्यांना बाहेर जावे लागते, असेही एजंटाकडून सांगण्यात आले.
---------------
दृष्टिक्षेपात
- कोल्हापुरात हंगाम काळात रोजचे भाविक ६० हजार ते सव्वा लाख.
- यात्री निवासात फक्त हजार भाविकांची सोय होते.
- शेकडो भाविकांना राहण्यास जागा नसल्याने रात्रीच्या अंधारात त्यांचा पुढे प्रवास सुरू होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com