कांदा भाव पडले

कांदा भाव पडले

86165
भाव पडले तरी कांद्याची आवक सुरूच
कोल्हापूर, ता. १ : राज्यभरातील बाजारपेठेत कांद्याचे भाव पडले आहेत. मात्र, कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ४ ते २० रुपये जादा भावात खरेदी होत आहे. त्यामुळे बहुतांशी कांदा उत्पादक शेतकरी कोल्हापुरात कांदा पाठवत आहेत. यातून येथे दुप्पट आवक झाली. याच वेळी दक्षिण भारतातून कांद्याची मागणी कमी झाल्याने कांदा विक्रीचा पेच निर्माण झाला आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या लासलगाव (जि. नाशिक) बाजारात कांदा भाव पडले आहेत. ३० ते ८० रुपये दहा किलोपर्यंत भाव आले. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भागवणेही मुश्कील झाले. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती पुणे, सोलापूर बाजार समितीच्या बाजारात आहे. बहुतांशी कांदा उत्पादन पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव ग्रामीणमध्ये होते. त्यामुळे राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी ६० टक्के कांदा लासलगाव नाशिक बाजारपेठेत पाठवला जातो. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठवला जातो. येथे सध्या श्रीगोंदा, बारामती, भिगवण, राशीन, इंदापूर, बार्शी, सांगोला भागातील येत आहे.
यंदा हवामानाची साथ लाभल्यामुळे कांदा उत्पादन चांगले आले. जानेवारीपर्यंत नियमित आवक होती. सरासरी भाव २०० रुपये होता. फेब्रुवारीपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या. कांदा साठवण्यासाठी जाळ्या अपुऱ्या पडू लागल्या. परिणामी, कांदा साठवणे मुश्कील झाले. अशावेळी पावसाची सर आल्यास कांदा खराब होईल या भीतीने बहुतेक शेतकरी कांदा बाजारपेठेत आणत आहेत. त्यामुळे सर्व बाजारात आवक वाढली तशी कोल्हापुरातही आवक वाढली. कोल्हापुरात कांद्याचे उत्पादन नगण्य आहे. त्यामुळे अवघा एक दोन टक्के कांदा येथे घाऊक बाजारात येतो. या उलट पुणे, सोलापूर ग्रामीणमधून रोजच्या ७ ते १० ट्रक माल येतो.
त्याचे सौदे होतात येथील अडते, व्यापारी हाच माल केरळ, कर्नाटक, गोवा कोकणकडे पाठवतात. मात्र, यंदा पर्यटनाचा हंगाम कोकण व गोव्यात थंडावला. परिणामी, कांद्याची मागणी कमी झाली. तशीच केरळमधून मागणी कमी झाली. येथील घाऊक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा पाठवायचा कोठे असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कोल्हापुरातही कांद्याचे भाव घसरले आहेत.

दृष्टिक्षेपात...
आठवडाभरातील एकूण आवक - ८ हजार ३४५ पोती
रोजची आवक सरासरी - ६ ट्रक
भाव - ४० ते १२० रुपये दहा किलो
एक किलोचा भाव - १५ ते २० रुपये

कोट
राज्यातील बाजार पेठात कांद्याचे शंभर रुपये दहा किलोपेक्षा खाली आलेत. कोल्हापुरात भाव पडला असला तरी अन्य बाजारपेठेच्या तुलनेत येथे ४० ते १२० रुपये दहा किलोचा भाव आहे. येथे शेतकऱ्याला ४ ते २० रुपये चढा भाव मिळतोय. त्यामुळे येथे आवक होत आहे. माल पडून खराब होऊन जाण्यापेक्षा कमी पैसे मिळाले तरी हरकत नाही अशा विचाराने येथे माल आणला आहे.
- जोतिराम चव्हाण, शेतकरी भिगवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com