शिवाजी पेठेत पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

शिवाजी पेठेत पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

88710
शिवाजी पेठेत पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको.

उग्र आंदोलनाचा इशारा; सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ११ ः शिवाजी पेठेतील सरदार तालीम परिसरातील नेताजी तरुण मंडळाजवळ आज रात्री ९ वाजता महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. गेले महिनाभर अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. एका दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला. अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला पांगवले.
शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळ, वेताळ तालीम, सरदार तालीम परिसर या भागात गेल्या महिन्याभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांची आहे. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा महापालिकेत अर्ज, विनंत्या केल्या. या परिसरात रोज सायंकाळी ७ ते ८ एवढे एकच तास पाणी येते. हा पाणीपुरवठाही अपुरा असतो. पाण्याचा दाब कमी असल्याने पाणी पहिल्या मजल्यावरही चढत नाही. याचा त्रास परिसरातील महिलांना सर्वाधिक होतो. आजही पाणी ७ वाजून गेले तरी आले नाही. अखेर परिसरातील महिला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर आल्या. त्यांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबली. येथील नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलावले. महापालिकेचे कर्मचारी दिसताच महिला आक्रमक झाल्या. त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच पाणी प्रश्नांचा पाढा वाचला. या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना पाणीपुरवठा कशामुळे अपुरा होतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी पाणीपुरवठा त्वरित सुरळीत झाला पाहीजे, अशी मागणी केली. दरम्यान, तेथे जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. त्यांनी मध्यस्थी करून महिलांना घरी जाण्याची विनंती केली. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
या वेळी नीता साळोखे, धनश्री पोवार, उषा गायकवाड, मंगल इंगवले, सरिता अपराध, बाळाबाई जाधव, राजू साळोखे, शिवाजी पोवार, जयवंत साळोखे, मुकुंद इंगवले, बाळासाहेब सूर्यवंशी, राजू भोसले, सागर पाटील यांच्यासह महिला व नेताजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------------------
‘या परिसरात गेले महिनाभर पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होत आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याची दखल घेत नाही. आयुक्तांना सांगून देखील काहीच होत नाही. त्यामुळे आज आम्ही रास्ता रोको केला. एका दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर मात्र आम्ही उग्र आंदोलन करणार असून याला प्रशासन जबाबदार असेल.

- लाला गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com