मुंबई विद्यापीठाने पटकविला ‘कुलगुरू चषक’

मुंबई विद्यापीठाने पटकविला ‘कुलगुरू चषक’

90769
90771

मुंबई विद्यापीठाने पटकविला ‘कुलगुरू चषक’
आंतर विद्यापीठ कर्मचारी टी-२० क्रिकेट स्पर्धा; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उपविजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः शिवाजी विद्यापीठातील राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ६ गडी राखून पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेत तृतीयस्थान मिळविले.
आज दुपारच्या सत्रात मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात स्पर्धेतील अंतिम सामना रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पुणे विद्यापीठाने २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. पुण्याच्या नितीन प्रसाद यांनी ५४ तर दीपक गजरमल यांनी २१ व विनोद नरके यांनी १९ धावा केल्या. मुंबईच्या संजय भालेराव आणि प्रवीण मुळम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. पुण्याचे हे आव्हान मुंबईच्या संघाने १७.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १४८ धावा करून पार केले. मुंबईकडून अत्ताउल्ला खान यांनी ५२, अनिल घडशी यांनी २३ व मनोहर माने यांनी २१ धावा केल्या. अताउल्ला खान सामनावीर ठरले. यापूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर ५ धावांनी मात करत तृतीय स्थान मिळविले.
बक्षीस वितरण प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते झाले. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे महासचिव मिलींद भोसले, सेवक संघाचे उपाध्यक्ष संजय पवार, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे आरोग्यदूत बंटी सावंत आदी उपस्थित होते.
..
चौकट
विनायक शिंदे ‘मालिकावीर’
दरम्यान, या स्पर्धेतील ७ डावांत २ अर्धशतकांसह २५७ धावा करणारा शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू विनायक शिंदे मालिकावीर ठरले. त्यांनी सर्वोच्च ८५ धावा केल्या. त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्येही १०.७७च्या सरासरीने त्याने १३ बळी घेतले. या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ते मालिकावीर ठरला.
..............................................
चौकट
सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज
स्पर्धेत ७ डावांत २ अर्धशतकांसह सर्वोच्च ९७ धावांची खेळी करीत ३१६ धावा करणारे मुंबई विद्यापीठाचे अनिल घडशी सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मारुती शेवाळे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. त्यांनी ५ डावांत ५.९५ च्या सरासरीने १३ बळी घेतले. गतिमान क्षेत्ररक्षणाच्या बळावर स्पर्धेत ११ खेळाडूंना बाद करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या नितीन प्रसाद यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com