

कोल्हापूर - शहर आणि ग्रामीण भागातील तफावत वाढत चालली असताना जिल्हा बॅंकेने मोबाईल ऍपसारख्या सुविधेच्या माध्यमातून ही सामाजिक विषमतेची दरी दूर केली आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी काढले.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अद्ययावत बेवसाईटसह मोबाईल बॅंकिंग सुविधेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी डॉ. थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते.
डॉ. थोरात म्हणाले,"जात, धर्म किंवा अन्य कारणापेक्षा शहर आणि ग्रामीण भागातील जी तफावत वाढत चालली आहे, त्याचा मोठा धोका देशाला असल्याचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम म्हणत होते. शहरी भागातील सुधारणा जोपर्यंत ग्रामीण भागात पोहचत नाहीत तोपर्यंत या देशाला भविष्य नसल्याचे डॉ. कलाम यांचे मत होते. या सुविधेच्या माध्यमातून बॅंकेने एक पाऊल पुढे टाकताना शहरी भागात मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागात पोहचवल्या आहेत. सामाजिक निकषाच्या मुल्यांकनात खरे श्रेय बॅंकेच्या या उपक्रमाला दिले पाहीजे.'
डॉ. थोरात म्हणाले,"तीन वर्षांपूर्वी बॅंकेच्या किसान क्रेडिट कार्ड वितरणाच्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा होतो. त्यावेळी अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी ही बॅंक नफ्यात आणून मगच तुम्हाला बोलावू , असा शब्द मला दिला होता. श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांच्या पाठबळावर बॅंकेने घेतलेली गरुडभरारी लौकिकास्पद आहे. पाच वर्षांपूर्वी हे संचालक मंडळ सत्तेवर येताना असलेला 130 कोटीचा संचित तोटा भरून काढून आजघडीला बॅंक 136 कोटींच्या ढोबळ नफ्यात आणली आहे, हे त्याचेच द्योतक आहे.'
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,"जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची पण जोपर्यंत सगळ्या ग्राहकांना मुख्य प्रवाहात आणले जात नाही तोपर्यंत बॅंकेची आणि ग्राहकांचीही प्रगती अशक्य होती. म्हणूनच ही सुविधा आणण्याची आवश्यकता होती. वसुलीत तडजोड करू नका, पारदर्शी काम करा, लोकांचा विश्वास संपादन करा असे डॉ. थोरात यांनी यापुर्वीच्या कार्यक्रमात सांगितले होते. त्यांच्या सांगण्यानुसार काम केले म्हणूनच पाच वर्षात उत्कृष्ट काम झाले. पुढील वर्षी 200 कोटीचा नफा मिळवल्याशिवाय रहाणार नाही.'
यावेळी शेतकरी खातेदार रवीराज निंबाळकर यांच्या मोबाईल ऍपमधून पैसे ट्रान्सफर करत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला संचालक खासदार संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, आर. के. पोवार, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, आसिफ फरास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी मानले. आभार संचालक अनिल पाटील यांनी मानले.
म्हणून सहकार टिकला पाहीजे
सहकारात घुसलेल्या अपप्रवृत्तीमुळे सहकारच रद्द करावा असा सल्ला मी वैद्यनाथन कमिटीचे अध्यक्ष श्री. वैद्यनाथन यांना दिला होता. त्यावेळेस त्यांनी मला तीन महिने सुट्टी घेऊन भारत फिरून मग अभ्यासानंतर म्हणणे देण्याचा सल्ला दिला. या अभ्यासात माणसे बघून बॅंकिंग करावे लागते आणि ते नाही केले तर शेतकरी मेला असता याची जाणीव मला झाळी. म्हणूनच सहकाराशिवाय गरीब शेतकऱ्याला कोणी वाली नाही आणि त्यासाठी सहकार टिकला पाहीजे, असे डॉ. थोरात म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.