
कोल्हापूर : कोरोनाची तीव्रत ज्या भागात कमी आहे, त्याठिकाणचे उद्योग सुरू व्हायला काही हरकत नाही. संबंधित उद्योजकांनी कामगारांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर्स यासारख्या सुविधा द्याव्यात. उद्योग सुरू झाले तर परराज्यातून आलेल्या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल, त्याचवेळी जिल्ह्यांच्या आणि गावागावांच्या सीमावरील तपासणी मात्र कडक करायला हवी, असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या पार्श्वभुमीवर "सकाळ' च्या रविवारच्या (ता. 12) अंकात "उध्दवजी, लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनेही' या शिर्षकाखाळी विशेष संपादकीय प्रसिध्द करण्यात आले होते. "सकाळ' च्या या भुमिकेविषयी श्री. मुश्रीफ यांची भेट घेतली असता ते बोलत होते.
श्री. मुश्रीफ म्हणाले,"ज्या भागात कोरोनाचा संशयित किंवा पॉझीटीव्ह आलेला रूग्ण नाही अशा भागात उद्योग, व्यवसाय सुरू व्हायला हरकत नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यापुर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांना याबाबत विचारले होते, त्यावेळीही आपण हीच भुमिका मांडली आहे. पण ज्याठिकाणी कोरोनाची तीव्रता जास्त आहे, तिथे निर्बंध अधिक कडक केले पाहीजेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात तर राज्य राखीव दलाची तुकडी बोलवावी लागली तरी ती बोलवावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा. आता तीव्रता कमी असलेल्या जिल्ह्यात आणि गावांतही लोक ऐकण्याची मनस्थितीत नाहीत.'
जिल्ह्यांच्या सीमावर कडक तपासणी आवश्यक
ते म्हणाले,"कोरोनाच्या तीव्रतेनुसार राज्यांना आणि जिल्ह्यांनाही ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये विभागण्याचा केंद्राचा निर्णय चांगला आहे. त्याचप्रमाणे झोननुसार काही सवलत दिली पाहीजे. उदाहरणार्थ कागल तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, त्यामुळे त्या तालुक्यातील उद्योगधंदे सुरू करायला हरकत नाही. 30 एप्रिलपर्यंत हा निर्णय व्हायला हवा, त्यानंतरची परिस्थिती बघून पुढील निर्णय झाला पाहीजे. उद्यापर्यंत देशात लॉकडाऊन कायम आहे, त्यानंतर पंधरा दिवसांचे हे नियोजन करायला हवे.'
ते म्हणाले,"पुढील पंधरा दिवसांत शेतीसह मासेमारी आणि जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी लोक जातात. भांगलण, पाणी देण्याबरोबर रब्बी हंगामातील पिके काढण्याच्या कामाला वेग आला आहे. त्या लोकांना याचा प्रादुर्भावही होत नाही. त्याच धर्तीवर योग्य ती खबरदारी घेऊन उद्योगधंदे सुरू व्हायला हरकत नाही. उद्योगधंदे सुरू झाले तर अर्थव्यवस्थेलाही थोडीशी चालना मिळेल.'
हेही वाचा- विश्वजीत कदम यांचा सवाल : भाजपने महापुरात काय मदत केली? -
उद्योगधंदे सुरू झाले तरी जिल्ह्यांच्या आणि गावांच्या सीमा मात्र कडक केल्या पाहीजेत. दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा गावातून एकही कोरोनाबाधित किंवा तशी लक्षणे दिसत असलेली व्यक्ती जिल्ह्यात येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी सीमेवरील तपासणी अधिक कडक केली पाहीजे. मुंबई, पुण्यासारख्या जिल्ह्यात कोरोनाची तीव्रता जास्त आहे, तिथे उद्योग सुरू करण्याची घाई करू नये, उलट अशा ठिकाणी कडक निर्बंध आणून कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न झाले पाहीजेत, असेही श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.