कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील यंदाचा ऊस गळीत हंगाम कसा होणार, याकडे कारखानदार, शेतकरी आणि ऊस तोडणी कामगारांचे लक्ष लागून राहिले होते. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर सध्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. साखर कारखान्यांचे धुराडे पेटण्याचे संकेत मिळताच मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
कोरोनामुळे यंदा रोजगार कसा मिळणार, ऊस तोडणी होणार का? तसेच जर तोडणी नाही झाली तर पहिल्या हंगामानंतर घेतलेल्या उचलीची परफेड कशी करायची? असे प्रश्न ऊसतोडणी कामगारांपुढे होते. हंगाम सुरु होणार असे कारखान्यांकडून समजताच कामगारवर्गात आनंदाची लहर उमटली आहे.
कोरोना संकट कायम असले तरी उदरनिर्वाहासाठी जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या परिसरातून ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या आपल्या कुटुंबासह कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाल्यात. गेले दोन तीन दिवस प्रवास करुन काही कामगार थकलेत. तरी कारखाना परिसरात तात्पुरता निवारा उभा करण्याचे काम पुरुष कामगारांनी छावण्या उभारत सुरु केलंय. तर महिलांनी खुल्या आभाळाखालीच स्वयंपाक करत लगबग सुरु केली आहे.
कोयता हातात घ्यावाच लागणार...
कोरोनाचे संकट टळले नसले तरी, कामगारांचा पोटासाठी प्रवास सुरु झाला आहे. छावणीच्या परिसरात कोरोनाची स्थिती कशी आहे याचा कानोसा कामगार घेत आहेत. छावणीचा परिसर शहरापासून दूर असला तरी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी त्यांना गर्दीच्या ठिकाणी जावे लागणार आहे.
कुठलं जरी संकट आलं तरी आमच्या हातातला कोयता सुटलेला नाही. राबणं आमच्या नशिबी आलंय. हंगाम नाही केला तर खाणार काय? लेकरंबाळं कशी जगवायची? कारखान्यांनी या म्हणून कळवलं अन् आम्ही संसार घेऊन आलोय.आता ऊसतोड लवकर सुरू व्हावी.
- रुक्मिणी कांबळे, ऊसतोड कामगार, बीड
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.