...तर काेरेगावचा माढा केला जाईल : जयकुमार गाेरे

...तर काेरेगावचा माढा केला जाईल : जयकुमार गाेरे

कोरेगाव : "कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी "कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच भावना आहे', अशी इच्छा प्रकट केली. 
नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रेश्‍मा कोकरे यांचा आमदार गोरे यांच्या हस्ते नागरी सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील, किरण बर्गे, अर्चना बर्गे, नितीन ओसवाल, पूनम मेरूकर, मानाजी घाडगे, अण्णासाहेब निकम, शुभांगी काकडे, अर्जुन वीर, विकास राऊत, अजित भोसले उपस्थित होते. 
किती दिवस निष्ठा- निष्ठा करत बसणार, निष्ठेने पोट भरते का? असा सवाल करत श्री. गोरे म्हणाले, ""आघाडी वगैरे मला माहीत नाही. क्षमता असलेलाच आमदार व संघटनेचा नेता झाला पाहिजे. एक कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा खासदार होतो, ही कॉंग्रेसची ताकद आहे. जिल्ह्यात अशी ताकदीची माणसे आपल्याकडे आहेत. या सर्वांनी ताकदीने पुढे आले पाहिजे आणि आपण सर्वांनीच एकत्र राहिले पाहिजे. सत्ता नाही म्हणून माझे एकही काम थांबले नाही, त्यासाठी क्षमता असली पाहिजे. कोरेगाव तालुक्‍यातही क्षमता असलेली माणसे आहेत; परंतु या क्षमतेचा वापर होताना दिसत नाही.'' 
ते म्हणाले, ""अर्चना बर्गे नगराध्यक्षा होतील म्हणून आपल्यातीलच काहींनी पाडापाडी केली. अन्यथा, नगरपंचायतीमध्ये आपलीच सत्ता आली असती. आपल्या मतांवर राष्ट्रवादीचा खासदार, आमदार झाल्याचे चालते. मग राष्ट्रवादीच्या मतांवर कॉंग्रेसचा नगराध्यक्ष झाला, तर का चालणार नाही, ही भूमिका घेतल्यानेच रेश्‍मा कोकरे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.'' माझे कोणाशी व्यक्तिगत भांडण नाही; परंतु 20 वर्षे मंत्री असूनही रामराजे यांनी आणि जिल्ह्याने प्रेम करूनही शरद पवार यांनी जिल्ह्याला पाणी दिले नाही, म्हणून या दोघांना माझा विरोध आहे. जिहे- कटापूर योजनेचा विषय मंत्री मंडळापुढे आलाच नाही. याबाबत आमदार शशिकांत शिंदे चुकीची माहिती देऊन अजित पवार यांची पाठराखण करत आहेत, असेही श्री. गोरे यांनी स्पष्ट केले. 
स्वाभिमान जपून जिल्ह्यात अनेक निर्णय घेणाऱ्या जयकुमार गोरेंनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हावे, अशी अपेक्षा भीमराव पाटील यांनी व्यक्त केली. त्यावर ठराविक वेळेत, ठराविक वयातच काही गोष्टी घडायला हव्यात, अशी टिप्पणी करत पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदामध्ये स्वारस्य नसल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले. 
तालुका कॉंग्रेसला सध्या अध्यक्षच नसल्याने सेनापतीविना सैन्याने लढायचे कसे, असा प्रश्न मनोहर बर्गे यांनी उपस्थित केला. 
सत्काराबद्दल नगराध्यक्षा कोकरे यांनी कॄतज्ञता व्यक्त केली. अर्चना बर्गे, डॉ. सुरेश जाधव, नीलेश माने, सम्राट बर्गे, ज्ञानेश्वर गोडसे यांचीही भाषणे झाली. अजित भोसले यांनी आभार मानले. 


"फिप्टी- फिप्टी' जागा हव्यात 
"माण मतदारसंघामध्ये मी आहेच. त्यामुळे माण वगळून जिल्ह्यातील उर्वरित जागांमध्ये "फिप्टी-फिप्टी' वाटप झालेच पाहिजे, असा आघाडीचा फॉर्म्युला आमदार गोरे यांनी या वेळी मांडला. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com