#जगणंलाईव्ह! - गाव जातं जत्रेला, होलार-रामोशी राखणीला !

#जगणंलाईव्ह! - गाव जातं जत्रेला, होलार-रामोशी राखणीला !

चार दिस पुरतील एवढी भाकरी, खरडा, भाजी गाठीला बांधून सारा गाव बैलगाड्या जुंपतो. कर्ती माणसं, बायका, लहानगी पोरं... सगळी नटून-थटून येतात. घुंगरांचा खुळखुळ आवाज करीत बैलं वाट मागं टाकत चालू लागतात. सारी लेंगरेवाडी धुळोबाच्या जत्रेला निघून जाते... मागं समाजाच्या वस्त्या एकट्या राहतात. पण, त्या एकट्या नसतात. त्या गावच्या राखणीला होलार अन्‌ रामोशी समाजातील माणसं हातात दांडकी घेऊन उभी असतात. सारी व्यवस्था करतात. नरवीर उमाजी नाईकांचा वारसा सांगणारी ही माणसं इमानदारीनं गाव राखतात.

ही परंपरा कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. हे लेंगरेवाडी म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कादंबरीत उतरलेली बनगरवाडी..! या गावावर एक सिनेमाही आला. या गावच्या परंपरा नव्या काळात माणुसकीच्या आड येणाऱ्या भिंतींना तडा देणाऱ्या आहेत. 

सलग २५ वर्षे सरपंच राहिलेल्या मुरलीधर लेंगरे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग लेंगरे यांनी या परंपरेचे पदर उलगडले. पंच्याहत्तरीला झुकलेला हा माणूस. त्यांनी सांगितलेली प्रथा मनात घर करणारीच. शहरातील फ्लॅट संस्कृतीत राहताना समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहतोय, याची कुणाला कल्पना नसते. अशा या बदलत्या काळात सारा गाव आनंद लुटायला, देवाचं दर्शन घ्यायला जत्रेसाठी जातो निर्धास्तपणे... आणि मागं त्याच गावातील जिव्हाळ्याचं नातं जपणारी माणसं गावाची 
राखण करतात.  

या गावातील माणसं आनंद कसा वेचतात, या प्रश्‍नावर लेंगरे यांनी माणुसकीचं गाठोडं रितं केलं. ते म्हणाले, ‘‘आम्ही सात वर्षांतून एकदा सातारा जिल्ह्यातील म्हसवड तालुक्‍यातील वाडाचा धुळोबा, धुळदेवाला जातो. दोन वर्षांपूर्वी सांगोला तालुक्‍यातील कटपळ येथील बिरोबाच्या यात्रेलाही गाव गेले होते. 

तर त्या देवाला जाताना सारं घरदार बाहेर पडतं. लहान-सहान पोरासकट सगळीजण जातो. शंभर-सव्वाशे बैलगाड्या जुंपल्या जातात. आठ दिवस सारे घराबाहेर असतात. धनगर समाजासाठी सात वर्षांतून एकदा कुलदैवताचा हा मोठा उत्सव असतो. त्याच्या आधी एक महिनाभर पन्नासएक जाणती माणसं रत्नागिरीला उदगिरी देवीला चालत जातात. तिकडूनच धुळोबाला येतात.’’ त्यांनी सांगितलं, ‘‘या काळात रामोशी, होलार समाजातील लोक गावची राखण करतात. जनावरांना चारा, पाण्याची व्यवस्था करतात. शेळ्या-मेंढ्या, गायी, म्हैशी... साऱ्यांची व्यवस्था करतात.

एखादं आजारी माणूस असलं तरी त्याची सेवा करतात. पाच-पाच पोरांचे गट करून गस्त घालतात. साऱ्या गावाचा त्यांचावर गाढा विश्‍वास. नरवीर उमाजी नाईक कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देत नव्हते. अगदी तसंच आमच्या गावात हाय,’’ असं सांगताना लेंगरे भारावले होते.

आनंददायी जबाबदारी 
उत्तम मंडले, समाधान मंडले, दत्तू मंडले, पोपट मंडले, माणिक मंडले, बाजीराव मंडले, सदाशिव जावीर, वसंत जावीर, नामदेव जावीर, पाडुरंग जावीर, ज्ञानू जावीर यांच्यासह पंचवीस घरातील सारे तरुण, महिला, पुरुष त्या काळात गावची जबाबदारी वाहत असतात. ही जबाबदारी म्हणजे आमच्यासाठी मोठा क्षण असतो, असं त्यांनी सांगितले. 

रामोशी समाजाचे २५ अन्‌ आमचे होलार समाजाचे १२ उंबरे. सारे मिळून आम्ही राखणीचे नियोजन करतो. कुणी कुठला भाग सांभाळायचा, हे त्या वेळी ठरतं. मोजकी माणसं गावात असतो. पण, सारा भार शिरावर घेऊन ती जबाबदारी पार पाडतो.’’
- वसंत जावीर, 
- उत्तम मंडले,

 गावकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com