खुषखबर...कर्जमाफीची रक्‍कम मार्चपर्यंत खात्यात होणार जमा 

kisan_karjmafi
kisan_karjmafi

सोलापूर : मार्चएण्डच्या ताळेबंद पत्रकातील बॅंकांचा एनपीए कमी व्हावा, शेतकऱ्यांना नवे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा व्हावा यादृष्टीने कर्जमाफीची माहिती संकलित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु झाले आहे. शेतकरी खातेदारांच्या कर्ज खात्याची पडताळणी करण्यासाठी सहकार विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी 55 तर राज्यभरासाठी एक हजार 137 लेखापरीक्षकांची नियुक्‍ती केली आहे. 15 जानेवारीपर्यंत पडताळणी अहवाल देण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत. 


महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील बळीराजाला दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. गतवर्षीचा दुष्काळ अन्‌ यंदाचा महापूर, अतिवृष्टी, अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे बॅंकांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यातील 23 जिल्हा बॅंकांची शेती कर्जाची थकबाकी सुमारे 23 हजार कोटींवर पोहचली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांचीही स्थिती अशीच आहे. दुसरीकडे मागच्या कर्जमाफीचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्‍कमही वाढत असल्याने बॅंकांचा एनपीए सरासरी 5 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्चएण्डपूर्वी कर्जमाफीची रक्‍कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे बॅंकांची थकबाकी वसूल होणार असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नव्याने कर्ज घेता येणार आहे. तर दोन लाखांवरील कर्जदारांची माहितीही लेखापरीक्षणातून समजणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र 'बिनव्याजी ओटीएस' योजना सुरु करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. 

राज्याची स्थिती 
एकूण शेतकरी 
1.53 कोटी 
नव्या कर्जमाफीचे लाभार्थी 
40.13 लाख 
कर्जमाफीची अंदाजित रक्‍कम 
18,700 कोटी 
लेखापरीक्षक नियुक्‍ती 
1,137 

कर्ज खात्यांची पडताळणी 15 जानेवारीपर्यंत 
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तत्काळ मिळावा यासाठी अकराशे लेखापरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सहकारी संस्था व बॅंकांमधील शेतकरी कर्जदारांच्या खात्याची पडताळणी त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. 15 जानेवारीपर्यंत अहवाल द्यावा, असे पत्र त्यांना देण्यात आले आहे. 
- डॉ. अनिल जोगदंड, अप्पर आयुक्‍त, सहकार, पुणे 

दीड लाखांचे लाभार्थी वगळले ? 
युती सरकारने श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी दिली. त्यानुसार सुमारे 40 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यापैकी बहूतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने कर्ज घेतले असून आता या शेतकऱ्यांना दीड लाखांचा लाभ मिळणार का, असा पेच निर्माण झाला आहे. बहूतेक या शेतकऱ्यांना दोन लाखांच्या कर्जमाफीतून वगळले जाण्याची शक्‍यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com