सत्तेच्या लालसेपोटी समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या मस्तवालांची मस्ती आता जनतेनेच उतरवायला हवी

सध्या देशात जो काही दलबदलुपणाचा खेळ सुरु आहे, तो पहाता या देशातील लोकशाही प्रणाली मुठभर लोकांच्या हितासाठी म्हण्यापेक्षा त्यांना विलासी जीवन जगण्याची, राजेशाही थाट जोपासण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे की काय असा प्रश्न पडण्याइतपत ती कमालीची ढासळली आहे.
lok sabha election people should take call now of its own benefit
lok sabha election people should take call now of its own benefitSakal

किल्लेमच्छिंद्रगड- सध्या देशात जो काही दलबदलुपणाचा खेळ सुरु आहे, तो पहाता या देशातील लोकशाही प्रणाली मुठभर लोकांच्या हितासाठी म्हण्यापेक्षा त्यांना विलासी जीवन जगण्याची, राजेशाही थाट जोपासण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे की काय असा प्रश्न पडण्याइतपत ती कमालीची ढासळली आहे.

तसा प्रश्न पडणेही स्वाभाविकच आहे. कारण जो पक्ष आयुष्यभर सत्ता, संपत्ती, मान, सन्मान सर्वकाही देतो. त्याच पक्षाने मुलास, जावयास, नातवास अगर अन्य सग्या सोयऱ्यास उमेदवारी दिली नाही म्हणुन माकड जसे या फांदीवरुन त्या फांदीवर उडी मारते तसे एका रात्रीत पन्नाशीची सत्ता भोगलेले सत्तरीचे नेते भ्रमिष्टाप्रमाणे पक्ष बदलत आहेत. हे सर्व पहाता एकच गोष्ट ध्यानात येते की या सत्तेच्या दलालांना जनतेशी आणि तिच्या हिताशी काहीही घेणे देणे नाही. ते असते तर आणि लोकशाहीची जर चाड असती तर त्यांनी असे जनतेशी द्रोहाचे कपट केले नसते.

परंतु मीच सर्वज्ञ... मी एकदा निवडुन आलो की मतदार संघ माझी खासगी जहागिरी... या हुकुमशाही प्रवृतीचा, अंगात राजकिय मस्तीचा जोर चढलेले हे नेते जनतेस विश्वासात न घेता जनतेला नागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे जनतेने आता ओळखायला हवे.

स्वातंत्र्यानंतरत्या सत्तर वर्षाच्या कालखंडाकडे मागे वळुन पाहिले तर ज्यांना आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे भोगायला मिळाली आणि ज्यांनी खासगी, सहकारातील सर्व सत्तास्थाने आपल्या आणि सग्यासोयऱ्यांच्या कल्याणासाठीच वापरली त्यांनाच अजुनही पुढे संधी हवी आहे.

ती जर पक्ष देत नसेल तर एका रात्रीत हे दुसरा घरोबा करण्यास तयार. जनतेशी आणि राष्ट्राशी निष्ठेची बांधीलकी जोपासण्याचे भान हरपलेल्या या सरंजामशहांना आपल्याशिवाय या देशाचे भले होवु शकत नाही. या भ्रमाने पछाडले आहे.

अशा या महाभागाच्या अराजकिय वागण्याने या देशाची देशातंर्गातील राजकिय व्यवस्था कमकुवत झाली आहे. यांनी सत्ता भोगली की पुढे यांच्या वारसांना सत्ता हवी असतेच. त्यामुळे असा प्रश्न पडतो की, जो काही देश चालवायचा विचार आणि नेतृत्वगुण अंगी असावा लागतो त्याचा काही यांच्याच घरावर पाऊस पडतो की काय? अगर यांनाच विधीलिखीत ताम्रपट लिहुन दिला आहे का?

बाप गेला, मुलगा राजकिय वारसा चालवायला ही पेशवाई, राजेशाही आहे का? जिथे जिथे राजकिय नेत्यांच्या अघोरी महत्वकांक्षेने राजकिय अस्थिरता निर्माण होवु पहात असेल अशा ठिकाणी स्वामित्वाचे जोखंड दुर करुन राजकिय बदलाची भुमिका पार पाडायला हवी.

नाहीतर आज जे काही देशभरात सत्तेसाठी राजकिय रणांगण चालु आहे, ते पुढे असेच सुरु राहिले तर देशाच्या आर्थिक विकासाची घडी बिघडेल, सामाजिक समतोल ढासळेल. विकास दरावर परिणाम होईल.

सामाजिक स्वास्थ बिघडुन संधीसाधुंचे फावेल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. शत्रु सिमेवर चाल करेल. हे सर्व ओळखुन भ्रष्ट,भ्रमिष्ट, सत्तेच्या लालसेपोटी समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या मस्तवालांची आता जनतेनेच मस्ती उतरवायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com