Election Results : शेट्टींना झटका; जयंतरावांना इशारा 

Election Results : शेट्टींना झटका; जयंतरावांना इशारा 

इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जयंत पाटील यांच्या विरोधात गेल्यावेळी खासदार राजू शेट्टींनी 23 हजारांचे मताधिक्‍य घेतले होते. आता जयंतराव सोबत असूनही तेवढे मताधिक्‍य टिकवणे शेट्टींना यावेळी अशक्‍य झाले. शेट्टींना पराभूत करायचेच या इराद्याने विरोधकांनी जातीसह काढलेली सर्व अस्त्रे आणि साखर कारखानदारांशी केलेला संग ही दोन प्रमुख कारणे शेट्टींच्या पराभवाची ढोबळमानाने सांगता येतील. 

ऊस आंदोलनाचे राजकीय यश शेट्टींना भरभरून मिळाले. आमदारकी आणि दोन वेळा खासदारकी रुपाने ते त्यांच्या पदरात पडले. ऊस पट्टयातील इस्लामपूर मतदारसंघात त्यांनी कारखानदारविरोधी घेतलेली भूमिका त्यांच्या यशाची कमान चढती ठेवणारी ठरली. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रीय प्रश्‍नांवर मोदी सरकारला लक्ष्य करीत घेतलेली दिल्लीतील भूमिका गल्लीत मात्र पटली नाही. 

शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेते खासदार राजू शेट्टी व कारखानदार जयंत पाटील यांची झालेली युती त्यांना अपेक्षित मताधिक्‍याआड आल्याचे दिसून आले. अर्थात जयंत पाटील यांनी मतदारसंघात तळ ठोकून त्यांनी शेट्टींचा ढासळता गड सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी शेट्टींचा "करेक्‍ट' कार्यक्रम केलाच. 

शेट्टींच्या पराभवामुळे वाळवा तालुक्‍यातील जयंत विरोधकांचा आत्मविश्‍वास दुणावणार यात शंका नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयंत विरोधकांची मोट बांधण्याचा नक्की प्रयत्न होईल. आता ही धुरा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे असेल. पहिल्या म्हणजे 2009 च्या विजयाच्या वेळी शेट्टींना इस्लामपूर मतदारसंघात मताधिक्‍य मिळाले नव्हते. दुसऱ्या वेळी मात्र 23 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. आता हे मताधिक्‍य वाढले नाही तरी कायम राहील अशी त्यांची अपेक्षा मात्र फोल ठरली. 

शेट्टींनी या लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवावी, असा सर्वसामान्य मतदारांचा सूरहोता, मात्र सध्याच्या महायुती-महाआघाडीच्या ध्रुवीकरणात ते कितपत यशस्वी ठरले असते याबद्दल शंका आहे. तथापि कॉंग्रेस संग पटला नाही हे मात्र ठामपणे म्हणता येईल.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघात गेल्या वेळी अनेक ठिकाणी, अनेक गावात शेट्टींना पोलिंग एजंट मिळाले नव्हते. तरीही त्या गावात शेट्टी आघाडीवर होते. विरोधकांनी शेट्टींना लक्ष्य करताना खासदारकीसाठी ज्यांना "शिव्या घातल्या त्यांच्या मांडीवर जाऊन बसले हा बिनतोड मुद्दा मांडला. त्याचा मुकाबला शेट्टींना पूर्ण ताकदीने करता आला नाही. शेट्टींचा पराभव जयंत पाटलानांही विधानसभा निवडणुकीच्या मांडणीत आव्हान देणारा ठरेल. नगरपालिका निवडणुकीपासून हादरा देण्यास जयंत विरोधक यशस्वी झाले आहेत. आता ते उद्यापासून पुन्हा दुप्पट ताकदीने कामाला लागतील यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com