लोकसभा दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार - अशोक चव्हाण

Ashok-Chavan
Ashok-Chavan

कऱ्हाड - पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूरपासून सुरू झालेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दिवाळी आदी सणांचा कालावधी वगळता पाच टप्प्यांत राज्याचा दौरा पूर्ण करेल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, येऊ घातलेली लोकसभा निवडणूक दोन्ही काँग्रेस एकत्र लढवणार असल्याचा पुनरुच्चार करताना जागा वाटपाचे सूत्र विनिंग फॅक्‍टर व मेरिटवर अवलंबून राहणार आहे. त्यावर अधिकृत चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा काल रात्री येथे दाखल झाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाण्यापूर्वी खासदार चव्हाण यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, आनंदराव पाटील, सचिन सावंत, अमर काळे आदी उपस्थित होते. 

खासदार चव्हाण म्हणाले, ‘‘बहुमताच्या जोरावर सर्व गोष्टी रेटून नेण्याची भाजपची भूमिका राहिली आहे. अतिआत्मविश्‍वास, तसेच सत्ता व पैसामुळे भाजपने गती घेतली आहे. त्यात शासकीय यंत्रणांचा दुरोपयोग होत असल्याने इंग्रजाच्या विरोधात लढा उभारल्यासारखीच सध्याची स्थिती आहे. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून माहिती घेऊन त्याचा उपयोग राजकीय कारणांसाठी करायचा अशी सध्या परिस्थिती आहे. खासदार शेट्टी यांच्याशी दोन वेळा चर्चा झाली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची व खासदार शेट्टी एकदा भेट झाली आहे. त्यामुळे खासदार शेट्टी काँग्रेससोबत येण्याचे समीकरण निश्‍चित जमेल असे दिसते. सांगली महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारी देताना चुका झाल्याने सात ते आठ जागा गेल्या, हे मान्य करावे लागेल. उमेदवार देताना अधिक काळजी घ्यायला हवी होती. मात्र, तेथे काँग्रेसला चांगली मते मिळाली आहेत.

उंडाळकरांबाबतचा पृथ्वीराज चव्हाण घेतील निर्णय
काँग्रेसपासून अलिप्त असलेल्या माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या घरवापसीच्या प्रश्‍नावर चव्हाण म्हणाले, ‘‘विलासकाका आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आजही त्यांच्याशी संबंध चांगले आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही येथे आले त्या वेळी त्याबाबत विधान केले होते. त्यांच्यामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेसला बळकटीसाठी ज्या गोष्टी घडतील त्या व्हाव्यात, या मताचा आहे. पक्षाच्या बळकटीसाठी कधीही मागे पुढे पाहात नसल्याचे सांगून उंडाळकरांबाबतचा आमदार पृथ्वीराज चव्हाण योग्य तो निर्णय घेतील. त्यांचा निर्णय मान्य असेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com