लांबच्या एसटी रात्री बंद

लांबच्या एसटी रात्री बंद

कोल्हापूर - नोकरी, व्यवसाय, पर्यटनासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची संख्या राज्यभरात मोठी आहे; मात्र राज्यातील निम्म्याहून अधिक बस स्थानकांवरून रात्री दहानंतर कोल्हापूरकडे येण्यास, तसेच कोल्हापुरातून मुंबईसह अन्य शहरांकडे जाण्यासाठी एसटी गाड्यांची सोय नाही, हे वास्तव आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास राज्यातील २३० हून अधिक दीर्घ पल्ल्यांच्या एसटी फेऱ्या रद्द केल्या. त्याचा फटका एसटीच्या उत्पन्नाला बसला. अशातच मुख्यमंत्र्यांनी ‘ई बससेवा’ सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पूर्ण होणार का? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

एसटी महामंडळाला ‘ई बस’ सेवा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिल्या. ही ‘ई सेवा’ व्हायची तेव्हा होईल, पण अर्ध्याहून अधिक राज्यांत रात्री लांब पल्ल्याच्या सेवेच्या नियोजनाचे तीन-तेरा वाजले आहेत. ग्रामीण भागातील तरुण वर्ग नोकरीनिमित्त विविध शहरांमध्ये स्थायिक झाला आहे. तो सुटीच्या दिवशी दिवसभर काम करून रात्रीचा प्रवास करून गावी येतो. मात्र, राज्यातील ४२ हून अधिक तालुक्‍यांतील बसस्थानकांतून मुंबई, कोल्हापूरसह अन्य शहरांकडे जाण्यासाठी रात्री दहानंतर गाडीच नाही. अशीच स्थिती कोल्हापूरसह १२ शहरांमध्ये आहे.   

कोल्हापुरातून पुणे, मुंबईसह अन्य शहरांकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पणजी, सोलापूर, तुळजापूर, पुणे या मार्गावर मध्यवर्ती एसटी बसस्थानकातून रात्रीच्या बसेस उपलब्ध आहेत. मात्र, रात्री दहानंतर मुंबई, औरंगाबाद, बंगळुरु, शिर्डी, नाशिक, ठाणे, हैदराबाद या शहरांकडे जाण्यासाठी एसटीच्या गाड्याच नाहीत. परिणामी त्यांना खासगी आरामगाड्यांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे एसटीच्या महसुलात घट आणि खासगी कंपन्यांचा वाढता नफा, असेच चित्र आहे. मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांना हे सूत्र माहीत आहे. तरीही नवीन गाड्या सुरू करण्यापेक्षा प्रवासी नाहीत, असे सरळधोपट कारण सांगत गाड्या बंद करण्यावर त्यांचा भर असल्याचे समजते. 
कोल्हापूरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामध्येही आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत तसेच हैदराबाद, बंगळुरू अशा शहरांत जाणाऱ्या प्रवाशांना खासगी बसेसचा आधार घ्यावा लागत आहे.

ई-बस सेवा कधी ?
एसटी महामंडळाने ‘ई बस’ सेवा सुरू कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. एसटी महामंडळाचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना सुलभ सुविधा देण्याबाबत मुंबईत बैठक झाली, त्यात या सूचना देण्यात आल्या. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. या सेवांमुळे तीनशे किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन बुकिंग, जर्नी कार्डसह, इंटरनेट सेवांचा लाभ एकाच वेळी घेता येणार आहे, असे ‘ई बस’ सेवेचे स्वरूप अपेक्षित आहे; मात्र ही सेवा केव्हा आकारास येणार हाच प्रश्‍न आहे?

कोल्हापूरच्या एसटी प्रवासी सेवेच्या ताफ्यात आणखी काही शिवशाही गाड्या येत्या काळात उपलब्ध होणार आहेत. प्रवासी संख्या जशी मिळेल त्यानुसार त्या गाड्या मुंबईसह अन्य शहरांसाठी वापरल्या जातील.
- एस. बी. जाधव,
अधिकारी, एसटी विभागीय वाहतूक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com