शासनाच्या बदलत्या निर्णयाला वैतागले प्राचार्य 

collage-elaction.jpg
collage-elaction.jpg

सोलापूर : राज्यातील महाविद्यालयांमध्ये व अकृषी विद्यापीठांमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला. मात्र, आतापर्यंत दोनवेळा निवडणुकीचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सप्टेंबरऐवजी आता या निवडणुका 30 नोव्हेंबरनंतर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दरम्यान, शासनाकडून होणाऱ्या वारंवारच्या बदलाला प्राचार्य वैतागले आहेत.

दरम्यान, राज्यातील पूरस्थिती अन्‌ आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या कारणांमुळे महाविद्यालयीन निवडणुकीचा मुहूर्त हुकला आहे. पुणे, मुंबईसह अन्य विद्यापीठांनी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादीसह अन्य टप्पे पूर्ण केले असतानाही निवडणुका लांबणीवर पडल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. महाविद्यालयीन व विद्यापीठांच्या निवडणुकांमधून चांगले नेते तयार होतील, मतदानाविषयी तरुणांमध्ये जागृती होईल, या उद्देशाने या निवडणुका 27 वर्षांनंतर घेण्याचा निर्णय झाला. मात्र, तो मुहूर्त क्षणाचाच ठरला. निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत घेण्याचे निर्देश सुरवातीला दिल्यानंतर विद्यापीठांसह महाविद्यालये व विद्यार्थी संघटनांनी युद्धपातळीवर तयारी केली. परंतु, आता या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतरच होतील, असे शासनाने स्पष्ट केल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्‍त केली. 

सरकारच्या बदलाला राज्यपालांची मंजुरी 
लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेसह दुष्काळ, महापूर व त्सुनामी या नैसर्गिक आपत्तींवेळी अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये नाही. मात्र, राज्यातील पूरस्थिती, आगामी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे गृहीत धरून या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाकडे ठेवण्याची नवी तरतूद कायद्यात करण्यात आली आणि राज्यपालांनी त्याला तत्काळ मंजुरी दिली आहे. 

परीक्षा कालावधीत निवडणूक अशक्‍यच -
विद्यापीठांसह महाविद्यालयांच्या परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये सुरू होऊन दीड महिन्याने संपतात. दरम्यान, याच कालावधीत युवा महोत्सव, क्रीडा स्पर्धा असतात तर फेब्रुवारी- मार्चमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा असतात. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये त्या परीक्षांचे केंद्र असते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील का, याचे नियोजन सुरू असल्याचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com