देश आणि संविधान वाचविण्यासाठी एक व्हा - मेधा पाटकर

कोल्हापूर : जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयतर्फे संविधान सन्मान यात्रेचे शाहू स्मारक भवनात आयोजन केले. याप्रसंगी महापौर सौ. शोभा बोंद्रे, मेधा पाटकर, मधुरेश कुमार, सुरेखा दळवी, मीरा बहन, सुनीती सु. र., पुनम कनोजिया, योगीराज आदी. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्र
कोल्हापूर : जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयतर्फे संविधान सन्मान यात्रेचे शाहू स्मारक भवनात आयोजन केले. याप्रसंगी महापौर सौ. शोभा बोंद्रे, मेधा पाटकर, मधुरेश कुमार, सुरेखा दळवी, मीरा बहन, सुनीती सु. र., पुनम कनोजिया, योगीराज आदी. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्र

कोल्हापूर - "देश आणि संविधान वाचविण्यासाठी सगळ्या शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे.  देशाच्या विकासाबद्दल जो विकृत प्रचार केला जात आहे, त्याला संविधान हेच उत्तर आहे'', असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले. 

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्यवतर्फे आज संविधान सन्मान यात्रा कोल्हापुरात आली. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. स्वागत समितीचे अध्यक्ष सौ. शोभा बोंद्रे यांनी स्वागत केले. तत्पूर्वी, महापौर सौ. बोंद्रे यांच्या हस्ते दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण केला. न्यू कॉलेजच्या विवेक वाहिनीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र, समता, बंधुता, गाऊ या संविधान, राबवू या संविधान हे गीत गायिले. शाहिर राजू राऊत यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पोवाडा गायिला. 

राज्यकर्ते सत्तेवर बसून अनेक करामती करत आहेत. तरीही अजून राज्यकर्तांना संविधान नाकारता आलेली नाही. संविधानाची ताकद ही प्रचंड आहे.

- मेधा पाटकर

गुजतरातमधील दांडीपासून या यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या 20 ऑक्‍टोबर ते पाच नोव्हेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळचा समावेश आहे. 11 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरच्या तिसऱ्या टप्प्यात झारखंड, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्लाचा समावेश आहे. 

मेधा पाटकर म्हणाल्या, ""आज देशातील प्रत्येक समुदाय विविध प्रश्‍नांवर लढतो आहे. म्हणूनच देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपला वेळ वाया घालवू नये. सध्याची परिस्थिती निराशजनक आहे. सामान्य नागरिकांचे अधिकार अक्षरश: तुडविले जात आहेत. राज्यकर्ते संविधानावर हात घेऊन शपथ घेतात; पण नंतर मात्र संविधानाचा साधा उल्लेखही करत नाहीत. सध्या भक्ष आणि लक्ष केले जात आहे. संविधानाची संरचना बदलण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याकरीता मतदारांपर्यंत संविधानाची ताकद पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. आजही आपली ताकद कमी पडते आहे. देशभरात अनेक ठिकाणी पद्धतशीरपणे हिंसाचार घडवून आणला जात आहे. आदीवासी, दलित, अन्य जातीसमुहांना लक्ष वेधले जात आहे. .'' 

सरकारकडून कायदे बदलले जात आहेत. लोकपाल नियुक्त केलेला नाही. पर्यावरणाची स्थिती चांगली नाही. देशभरातील अनेक राज्यात प्रदुषणाची समस्या बिकट झाली आहे. ग्रामपंचायत, ग्रामसभा ही पंगू झाली आहे. विचारवंतांच्या हत्या होत आहेत. जंगले, वनअधिकार, जमिनीवर अतिक्रमण होत आहे. याकरीता संविधानाची जपणूक झाली पाहिजे.

- मधुरेश कुमार

तेलंगणा येथील मीरा बहन म्हणाल्या, ""संविधानाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी काश्‍मिरपासून कन्याकुमारीपर्यंत गुजरातपासून आसामपर्यंत सर्व सामान्य नागरिकांची एकजूट करावी लागेल.''

सुरेखा दळवी, योगीराज, सुनीती सु. र., पुनम कनोजिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक मिठारी यांनी संविधानाचे वाचन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com