श्रीगोंदे : शहरासह तालुक्यातून मुलींसह महिला गायब होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमालीचे वाढले आहे. त्यामुळे मुलींच्या असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, महिला हरवण्याचे प्रमाण थक्क करणारे आहे. शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या मुलींच्या पालकांची चिंता वाढविणारी आकडेवारी पुढे येत आहे. गेल्या दोन वर्षांत तालुक्यातून 46 मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच तब्बल 167 महिलाही बेपत्ता झाल्याने येथील सामाजिक वातावरण गढूळ होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा- नगरसेवक घुसले जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत
शैक्षणिक चळवळ वाढविणारा तालुका म्हणून पुढे येणाऱ्या श्रीगोंद्यात गेल्या काही वर्षांत वेगळीच लागण झाल्याचे दिसते. गावातून शहरात महाविद्यालयात येणाऱ्या मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे व होतही आहे. मुलींच्या शिक्षणाकडे पालकांसह समाज सकारात्मक लक्ष देत असतानाच, गेल्या काही दिवसांत मुली पळून जाण्याचे वा त्यांना पळविण्याचे प्रकार कमालीचे वाढले आहेत. तालुक्यातील श्रीगोंदे व बेलवंडी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती मागितली असता, पोलिसांनाही या गंभीर घटनांची चिंता असल्याचे लक्षात आले.
कुटुंबीयांच्या छातीत धस्स
गेल्या दोन वर्षात श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीत 34, तर बेलवंडी हद्दीतून 13 मुलींचे अपहरण झाल्याच्या फिर्यादी नोंदल्या आहेत. त्यांपैकी 41 मुली पोलिसांनी शोधून दिल्या. अठरा वर्षांखालील या मुली असून, त्यांच्या पालकांनी फिर्यादी दिल्या आहेत. याव्यतिरिक्त पोलिसांपर्यंत न आलेल्या घटनाही जास्त असल्याची चर्चा आहे.
अज्ञान मुलींच्या तुलनेत सज्ञान महिलांचे गायब होण्याचे प्रमाण थक्क करणारे आहे. यात काही जणी हरवल्या, रुसून गेल्या असल्या, तरी काही पळून गेल्याचीही उदाहरणे आहेत. दोन वर्षांत श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 112 महिला हरवल्याच्या तक्रारी दाखल असून, त्यांतील 83 जणी सापडल्या आहेत. बेलवंडी हद्दीतून 55 महिला हरवल्या व त्यांतील 37 महिला सापडल्याची आकडेवारी आहे. मात्र, अपहरण व हरवल्याच्या घटनांनी पालक आणि कुटुंबीयांच्या छातीत धस्स होऊ लागले आहे.
जाणून घ्या : राम शिंदे यांच्या याचिकेवर रोहित पवार म्हणतात..
पोलिसांना मोकळे काम करू द्या
मुलींच्या अपहरणाचे वाढते गुन्हे दाखल होऊ लागल्याने श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातून टारगट मुलांचा वावर असणारी ठिकाणे शोधली जात आहेत. कॅफे सेंटरला भेट देऊन तेथील मुले व मुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. मात्र, त्यांना या कामात मोकळीक मिळाली तरच ते प्रभावी काम करतील.
मुलांना विश्वासात घ्या
पोलिस भरकटलेल्या मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, घरापासून शाळेपर्यंत सगळ्यांनीच मुलांना विश्वासात घ्यावे. काही घटनांत मुलांवर विपरीत परिणाम होत असला, तरी बहुतांश मुले व मुली समाजात गांभीर्यानेच वागतात. भावी पिढी वेगळ्याच संशयाने दुखावली जाणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागेल.
- संजय सातव, पोलिस उपअधीक्षक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.