सांगली - मिरजेत "एसबीआय'च्या एटीएम यंत्रामध्ये रक्कम भरण्यापूर्वी जीपची काच फोडून 30 लाखांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीतील एकाकडून 25 लाख रुपये स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जप्त केले. तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. सहा जणांची ही टोळी लवकरच जेरबंद केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, 'मिरजेत सतारमेकर गल्लीत आठ फेब्रुवारीला दुपारी "एसबीआय'च्या "एटीएम'मध्ये प्रोसिगर होल्डिंग कंपनीकडून रोकड भरणा करण्यास जीप आली होती. जीपमधील कर्मचारी बॅंकेत गेल्यानंतर दोन चोरांनी दुचाकीवरून येऊन जीपची काच फोडून 30 लाख लांबविले. दिगंबर धुमाळ (सांगली) यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. "सीसीटीव्ही'च्या चित्रीकरणात चौघा संशयितांचे चित्रण होते."एलसीबी'चे निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक पथक तमिळनाडूत तिरुचिरापल्ली येथे गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा घालून बालसुब्रमण्यम या मुख्य संशयिताच्या घरातून 25 लाख रुपये जप्त केले. लवकरच ही सहा जणांची टोळी जेरबंद केली जाईल.''
या सहा जणांच्या टोळीतील दोघे कर्नाटक व आंध्र प्रदेशातील आहेत. इतर चौघे तमिळनाडूतील आहेत. या कारवाईत भाग घेतलेल्या "एलसीबी'च्या पथकास सात हजार 500 रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र पहिल्या टप्प्यात दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
|