वाहनतळ नावाला... आधार तळीरामांना... 

वाहनतळ नावाला... आधार तळीरामांना... 

महाबळेश्‍वर - महाबळेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुमजली वाहनतळाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेल्या वाहनतळास कोणी वालीच राहिला नसल्याची स्थिती आहे. राजरोसपणे अनेक गैरप्रकार घडत असल्याने येथील वाहनतळ पर्यटकांच्या सोयीऐवजी तळीरामांचाच आधार ठरू लागले आहे. 

येथील वाहन तळाला एकूण तीन मजले आहेत; परंतु कोणत्याही मजल्यावर प्रवेशद्वार नसल्याने कोणीही या वाहनतळावर विनासायास ये- जा करीत आहे. दिवसा तळमजल्यावर, तर तीनही मजल्यांवर रात्री- अपरात्री तळीरामांचा राबता असतो. रोज सकाळी येथे दारूच्या मोकळ्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास असा कचरा येथे नियमित पडतो. या वाहनतळावर सुरक्षा रक्षक नसल्याने भुरट्या चोरांना चोरी करण्यासाठी हे वाहनतळ अगदी सुरक्षित ठरू लागले आहे. अनेक वेळा या वाहनतळावरून वाहनांच्या टायरची चोरी झाली आहे. या वाहनतळावर सीसीटीव्ही लावण्यात आला नसल्यामुळे गैरप्रकारांना आळा घालणे शक्‍य होत नाही. या वाहनतळाशेजारीच टॅक्‍सी तळ असल्याने तळमजल्यावर मोठ्या संख्येने टॅक्‍सीचे पार्किंग होत असल्याचे दिसते. त्यामुळे या मजल्यावर पर्यटकांच्या वाहनांपेक्षा काळ्या पिवळ्या टॅक्‍सींची संख्या अधिक दिसते. त्यामुळे पालिकेने हा मजलाच टॅक्‍सी संघटनेच्या नावावर केला आहे, की काय अशी शंका येते. 

पहिल्या मजल्याच्या आउट गेटचा वडापच्या जीप गाड्यांनी ताबा घेतला आहे. वाई मार्गावर वडाप वाहतूक करणारी वाहने या गेटवर क्रमांक लावून बसलेले असतात. त्यामुळे अनेक वेळा पर्यटकांना आपली वाहने बाहेर काढताना नाहक त्रास सहन करावा लागतो; परंतु पालिकेचे कर्मचारी कोणालाही काहीही बोलत नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार येथे राजरोसपणे सुरू आहे. शहरातील अनेक बेवारस वाहने या वाहनतळावर गेली एक ते दोन वर्षे पडून आहेत. या वाहनांमुळे हंगामात पर्यटकांच्या वाहनांना जागा मिळत नाही; पण पालिका मात्र या वाहनांबाबत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेत नाही. 

येथील अनेक रहिवाशांची, धनिकांची व व्यापाऱ्यांची खासगी वाहनेही या वाहनतळावर फुकटात उभी केली जात असून, पालिका अशा वाहनधारकांकडून कोणतेही शुल्क घेत नसल्यानेही आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. त्यामुळे अनेक खासगी वाहने जागा अडवून वाहन तळावर उभी राहात आहेत.

नामांतराचा वाद नुकसानकारक
उत्पन्न मिळवून देणारे चांगले साधन म्हणून या वाहन तळाकडे पाहणे आवश्‍यक आहे; परंतु नामांतराच्या वादामुळे पालिकेने या वाहन तळाकडे दुर्लक्ष केले आहे. हे वाहनतळ खासगी ठेकेदाराकडे चालविण्यासाठी हस्तांतर करणे आवश्‍यक आहे; पण या वाहनतळाचा खासगी ठेका काढला जात नसल्याने पालिकेचे मात्र मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कायम गांधारीच्या भूमिकेत असलेले पालिका प्रशासन या बाबतीतही सुस्त असल्याने वाहनतळावर चालणारे गैरप्रकार कोणाच्या जीवावर बेतणारे ठरू नयेत, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com