बार्शी - मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. सध्या आरक्षणाचा प्रश्न टोकाला जात असून, वंचित घटकांना शिक्षित करण्यासाठी आरक्षण ही गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
गौडगाव (ता. बार्शी) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'आरक्षणाचा प्रश्न टोकाला जात आहे. आरक्षण हे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक अशा इतर वंचित घटकांना हवे आहे; मग ते कोणत्याही जाती धर्मातील असोत. आरक्षणाचीही मागणी योग्यच आहे. शिक्षणात आरक्षण असणे आवश्यक असून शिक्षण घेऊन वंचित घटक मुख्य प्रवाहात येऊ शकतील. शैक्षणिक संस्थांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभारले पाहिजे. काळ बदलत आहे, केवळ शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून आले तर कुटुंबाची प्रगती होत नाही. शेतकरी कुटुंबाने शेती, उद्योग, शिक्षण घेऊन नोकरी असे वेगवेगळे स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. शेतीबरोबर अन्य उत्पन्नाची साधने निर्माण करावीत.''
|