नगर तालुका ः अपघात केला एका वाहनाने सापडले दुसरेच. त्यातील लोकांना खाली उतरवून रस्त्याकडेच्या लोकांनी चांगलेच बदलले. आम्ही कोण आहोत, आमची चूक नाही, असे म्हणण्याचीही संधी त्यांना लोकांनी दिली नाही. त्या वाहनात होते सरकारी अधिकारी.
हे बराच वेळानंतर लोकांना कळाले. मग मार खाल्लेल्या अधिकाऱ्यांनीही तक्रार देण्याचे टाळले. तेरी भी चूप आणि मेरी चूप अशी अवस्था होती. मात्र, व्हायचे तेच झाले ही खबर लिक झालीच. पोलिस ठाण्यातच खबर नाही म्हणल्यावर नावं तरी कशी उघड होणार?
त्याचे असे झाले ः बायजाबाई जेऊर (ता. नगर) परिसरात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुहेरी अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. बघ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनावरच हल्ला चढविला.
अनसूया भगवान पालवे (वय 60, रा. उदरमल, ता. नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. आज लग्नसराईतील मोठी तिथी असल्याने वाहतुकीची वर्दळ होती. दुपारी तीन वाजता नगर-औरंगाबाद रस्त्यावरील बायजाबाई जेऊर परिसरातील बारावाड्यांकडे जाणाऱ्या फाट्यावर अनसूया पालवे या दुचाकीवर मागे बसून चालल्या होत्या. त्या दुचाकीला रस्ता ओलांडताना एका वाहनाने धडक दिली. यामुळे अनसूया पालवे दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या. त्याच क्षणी मागून येणाऱ्या वाहनाखाली त्या आल्याने गंभीर जखमी झाल्या. त्या ज्या वाहनाखाली आल्या, त्या वाहनात शासकीय अधिकारी होते.
बघ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनाला घेरत मारहाण केली. रावसाहेब माधव आव्हाड यांनी अनसूया पालवे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.