सांगली : पोषण आहार अनुदानापासून दीड लाख विद्यार्थी वंचित

शाळांची अनास्था; आदेशानंतरही अनुदान जमा करण्याकडे दुर्लक्ष
One and half lakh students deprived of nutrition subsidy
One and half lakh students deprived of nutrition subsidySakal

सांगली - शिक्षण विभागाने आदेश देऊनही शाळांनी अनास्था दाखवल्यामुळे सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहाराचे अनुदान पडून आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट जमा होण्यासाठी मुख्याध्यापकांनी तातडीने पाठपुरावा करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले आहे.

शासनाने उन्हाळ्याच्या सुटीच्या काळातील शालेय पोषण आहाराचे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक अथवा पोस्टाच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याचे आदेश काढले होते. त्यासाठीचा निधीही संबंधित जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्यात आला होता. शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेतील लाभार्थ्यांच्या संख्येनुसार शाळांकडे अनुदानाचा निधी वर्ग केला आहे. हा निधी संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची होती; परंतु अद्याप शाळांनी हा निधीच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न केल्यामुळे तो तसाच पडून राहिला आहे.

खाते नसल्याची अडचण

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्याचे आदेश आहेत, मात्र ग्रामीण भागांतील अनेक विद्यार्थ्यांनी बँकेत खाते काढले नसल्याचे समजते. अनुदान जमा होण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत अथवा पोस्टातही खाते असले तरी चालू शकते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निधी असल्याने पालकांनीच पुढे येऊन खाते काढण्याची गरज आहे. खातेच नसल्याने विद्यार्थ्यांना निधी देण्यात अडचण येत आहे.

शाळांचीही अनास्था

विद्यार्थ्यांच्या खात्यात शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करावे, याबाबतचे आदेश येऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी होत आला आहे. शिवाय शाळांकडे निधी वर्ग केला आहे; परंतु शाळांच्या विशेषतः मुख्याध्यापकांचा अनास्थेमुळे हा निधी पडून राहिला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून शाळांना स्मरणपत्रही पाठवण्यात आले आहे.

पावणेतीन लाख विद्यार्थी लाभार्थी

शालेय पोषण आहाराचा लाभ जिल्ह्यातील दोन लाख ७८ हजार ६८५ लाभार्थ्यांना मिळतो. यात पहिले ते पाचवी आणि सहावी ते आठवी असे दोन गट केले आहेत. एकूण एक लाख २९ हजार ९६७ विद्यार्थ्यांना अनुदान मिळाले आहे; तर एक लाख ४८ हजार ७१८ विद्यार्थी अजून अनुदानापासून वंचित आहेत.

सात कोटींचे अनुदान

शालेय पोषण आहारांतर्गत शासनाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २२५, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ३२५ रुपये अनुदान देण्यात येते. एकूण ७ कोटी ४ लाख ११ हजार ७४० रुपये अनुदान वाटप केले जाणार आहे. ही रक्कम जिल्हा परिषदेकडून शाळांच्या खात्यांवर वर्ग केली आहे, मात्र तेथून सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही.

शालेय पोषण आहाराचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आहे; मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचे खाते नसल्याने अनुदान जमा करण्यात अडचणी आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांनी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांची खाती काढण्यास सूचना देऊन लवकरात लवकर अनुदान जमा करावे.

- मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सांगली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com