थंडीमुळे एका बेघराचा सांगलीत मृत्यू

थंडीमुळे एका बेघराचा सांगलीत मृत्यू

सांगली - जगण्यानं छळलं होतं, मरणानं सुटका केली. अशी परिस्थिती बेघराची आहे. काल रात्री एका बेघरास थंडीने आपला जीव गमवावा लागल्याची घटना सांगली शहरात घडली आहे.

दीडशे लोक सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्याकडेला झोपतात. त्यांना निवारा शेड देणे ही महापालिकेची जबाबदारी, पण भल्याभल्यांची जबाबदारी टाळणाऱ्या मनपाच्या यंत्रणेने बेघरांची दखल घेतली, तर जगातले आठवे आश्‍चर्य ठरेल. अशा किती लोकांचा जीव गेल्यावर त्यांना जबाबदारीची जाणीव होईल हे सांगणेही कठीण आहे.  

जगण्यासाठी झुंजणाऱ्या या बेघरांसाठी महापालिकेने निवारा व्यवस्था करावी, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. आयुक्तांनी तशी घोषणाही केली होती, मात्र सारे हवेत विरले आहे.

शहरात अनेकदा वृद्ध, महिला वा पुरुष रस्त्याच्या कडेला झोपलेले दिसतात. त्यात घरातून हाकलून दिलेल्या ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. अनेक लोक झोपडपट्टीतील आहेत. सततचे वाद, अपमानास कंटाळून घर सोडलेलेही या गर्दीत दिसतात. त्यात काही मनोरुग्ण आहेत.

एका सर्वेक्षणानुसार, सांगली, मिरज, कुपवाड शहर आणि परिसरात सुमारे 150 बेघर आहेत. त्यात 40 महिलांचा समावेश आहे. ते बेघर असले, त्यांच्याकडे ओळखीचा पुरावा नसला, त्यांच्याकडे "आधार' नसले तर त्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मात्र, कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत.

सांगली येथील आनंद चित्रमंदिरजवळ काल रात्री एका बेघराचा मृत्यू झाला. बेघरांसाठी झटणाऱ्या इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिस ठाण्याशी तातडीने संपर्क साधला. पण, मुस्तफासारख्या लोकांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही, हेच खरे दुखणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com