शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण शिबिराला केवळ 13 शिक्षक हजर

शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण शिबिराला केवळ 13 शिक्षक हजर

मुरगूड - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर (डायट) यांच्यातर्फे 'समावेशित शिक्षण अध्यापन तंत्र पद्धती 'हे प्रशिक्षण मंगळवार ता. 12 ते 16 मार्च अखेर कागल तालुक्यातील शिक्षकांसाठी जोतिबा वाडी रत्नागिरी येथील रिसॉर्टमध्ये सुरु आहे. पण गैरसोयीचे ठिकाण, निवडणूक बीएलओ कामकाज, प्रज्ञाशोध परीक्षा, द्वितीय सत्र मूल्यमापन व पट्नोंदनीच्या कामामुळे या शिबिराला केवळ 13 च शिक्षक उपस्थीत आहेत. 80 टक्के शिक्षक अनुपस्थित राहिल्याने प्रशिक्षणाचा पुरता फज्जा उडाल्याचा दावा समन्वय समिती कागल यांनी केला आहे.

समावेशीत शिक्षणांतर्गंत 'अध्यपन तंत्र पद्धती' हे पाच दिवसीय जिल्हा स्तरीय निवासी प्रशिक्षण यापूर्वी डायटने आयोजित केले होते. पण काही कारणास्तव ते स्थगित झाले. राधानगरी व भुदरगड या दोन तालुक्यातील प्रशिक्षण आदमापूर येथे, तर शिरोळचे न्रूसिंहवाडी येथे झाले. प कागल तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण मंगळवार ता. 12 ते 16 मार्च या कालावधीत जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथील महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. हे ठिकाण कागल तालुक्यातील शिक्षकांना गैरसोयीचे ठरले. 

लोकसभा निवडणूक बी.एल.ओ कामकाज इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षा, द्वितीय सत्र मूल्यमापन आणि पट नोंदणी यासारखी कामे शिक्षकांना असल्यामुळे या प्रशिक्षण स्थळी शिक्षक उपस्थित राहू शकत नाहीत. त्याऐवजी हे प्रशिक्षण आदमापूर (ता.भुदरगड) या मध्यवर्ती ठिकाणी घेण्यात यावे अशी मागणी समन्वय समिती कागल यांच्यातर्फे करण्यात आली होती. 

समितिचे अध्यक्ष सुरेश कांबळे, सुकुमार पाटील, प्रकाश मगदूम, सदानंद यादव, एस के पाटील संजय दाभाडे जयवंत पाटील, रमेश कांबळे, नरगडी फकीर, तुकाराम राजुगडे, आयलू देसा, रविराज भोई, ओमाजी कांबळे, सिद्धार्थ कांबळे आदींनी 10 मार्च रोजी लेखी पत्राद्वारे ही मागणी केली होती. पण या मागणीकडे डायटचे प्राचार्य आय.सी.शेख यांनी दुर्लक्ष केले असा आरोप समन्वय समिती कागल यांनी केला आहे.

दरवर्षी मार्च अखेर कोणतेही प्रशिक्षण होऊ नये यासाठी देखील शिक्षक संघटना वारंवार मागणी करतात परंतु प्राचार्य शेख हे या मागणीचा कधीही विचार करत नाहीत. परिणामी या प्रशिक्षणापासून 80 टक्के शिक्षक वंचित राहिले आहेत.याला पूर्णतः प्राचार्य शेख जबाबदार असल्याचा आरोप समन्वय समिती कागल यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

एकूण 95 शिक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे अपेक्षित असताना केवळ 13 च शिक्षक उपस्थित राहिल्याने व तब्बल 80 टक्के शिक्षकांची गैरहजरी असल्याने प्रशिक्षण नेमके कुणासाठी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान याबाबत डायटचे प्राचार्य आय.सी.शेख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्हाला 80 ते 90 शिक्षक येणे अपेक्षित होते.पण 35 शिक्षकांनी नोंदणी केली. व तेवढे  उपस्थित राहिले. त्यामुळे शंभर टक्के उपस्थिती आहे. निवडणूक व अन्य शैक्षणिक कामांच्या निमित्ताने जे शिक्षक गैरहजर राहिले आहेत. त्या शिक्षकांची सोय - गैरसोय करण्याचा आमचा उद्देश नाही. पण त्यांना देखील पुढील सत्रात आम्ही सामावून घेत आहोत. समन्वय समिती कागल यांनी प्रशिक्षण सुरू असताना आपल्याला आज लेखी निवेदन दिले असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com