सोलापूर - 'महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी नव्या साहित्याला प्रेरणा दिली. यातूनच दुर्लक्षित समाजाच्या वेदना साहित्यातून व्यक्त करता आल्या,' असे मत येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा हिंदी व मराठी साहित्यावर पडलेला प्रभाव, महात्मा फुले यांचे जीवनकार्य या विषयांवर दोनदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. इरेश स्वामी, डॉ. बळवंत हौसेकर, रशियातून चर्चासत्रासाठी आलेल्या डॉ. तमारा आदी उपस्थित होते.
डॉ. लिंबाळे म्हणाले, 'अस्पृश्य लोकांना धार्मिक गुलामगिरी, अंधश्रद्धा व विषमतेच्या शृंखलातून महात्मा फुले यांनी मुक्त केले. त्यांनी मराठी साहित्याला वेगळा आयाम दिला, तर डॉ. आंबेडकरांनी माणसाला केंद्रबिंदू मानून लेखन केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी पुढे साहित्यात योगदान दिले.
डॉ. स्वामी म्हणाले, 'साहित्याची भूमिका ही माणूस समजावून घेणे, व्यवस्था बदलणे अशी असावी लागते. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांचे लेखन त्याच प्रकारचे होते. यामुळे त्यांचे लेखन आजही मानवी मनावर राज्य करत आहे.''
|