राळेगणसिद्धी - ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आजही आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. या उपेक्षित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. यापुढे राज्यभर जिल्हा, तालुका, तसेच खेड्यापाड्यांतही आरोग्य शिबिरे घेतली जातील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.
मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते. महाजन म्हणाले, 'शहरात यापूर्वी अनेक शिबिरे घेतली; पण त्यांची खेड्यांत गरज असल्याची जाणीव झाल्याने यापुढे ग्रामीण भागांत ती घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. प्रत्येक तालुक्यात अशी शिबिरे व्हावीत, अशी माझी संकल्पना आहे. फक्त गर्दीवर लक्ष केंद्रित केले नाही, तर येथे तपासणी होणाऱ्या रुग्णाची गरजेनुसार शहरातील नामवंत डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रियाही केली जाणार आहे. शिवाय, प्रवासाचाही खर्च करावा लागणार नाही. आगामी काही दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. धरणे बांधून मिळणार नाही, इतका आनंद एखाद्याचा जीव वाचला तर मिळतो.''
हजारे म्हणाले, 'जगात आनंद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, खरा आनंद अंतरंगात, जनसेवेत आहे. जनसेवा नसेल, तर जीवन व्यर्थ आहे. लोकसहभागातून अशी शिबिरे घेतल्यास राज्य आरोग्यमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.''
|