सांगोला : सांगोला तालुक्यामध्ये पाणीटंचाई आढावा बैठकीत सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार, खासदारांनी 72 तासांच्या आत पाण्याचे नियोजन करावे असा आदेश दिला होता. 72 तासात काय परंतु आठवडा उलटला तरी अनेक अधिकाऱ्यांनी आदेशाला जणू केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात पावसाअभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने 14 सप्टेंबर रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजी पाटील यांनी पाणीटंचाई आढावा बैठक सांगोल्यात घेतली होती.
या बैठकीसाठी निरा उजवा, टेंभू, म्हैसाळ इत्यादी पाणी योजनांच्या अधिकाऱ्यांसह इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये निरा उजवा कालव्याच्या 'टेल टू हेड' व कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांच्या रोषाला आमदार - खासदारांना सामोरे जावे लागले होते. तीच परिस्थिती माण नदीत पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबतही नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील रोष पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बैठकीतच अधिकाऱ्यांना तंबी देत 72 तासाच्या आत आपल्या विभागातील पाण्याचे सखोलपणे नियोजन करावे असा आदेश दिला होता. परंतु आठवडा उलटला तरी नियोजनाबाबत काहीच समजले नाही. निरा उजवा कालव्याचे पाणी अद्यापही तालुक्यात कमी दाबाने येत असल्याने लाभ क्षेत्रातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नुसत्या बैठका नको, उपाययोजना व्हाव्यात -
सध्या सांगोला तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता दुष्काळ संदर्भातील बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचे आदेशाचे पालन झाले पाहिजे. सध्याची पाणीटंचाई पाहता पाणी नियोजनाच्या बाबतीत 'अधिकारी काही बोलेना, आम्हाला काही कळेना' अशी परिस्थिती झाल्याचे नागरिक बोलत आहेत. बैठकीमधील आदेशांचे उपायोजना व्हाव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.
पाण्यात कधीच राजकारण करणार नाही - खासदार निंबाळकर
दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळेच पाणीटंचाईच्या आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत आदेश दिले होते. परंतु त्यांनी कसे, कोणत्या प्रकारे नियोजन केले याबाबत मी निश्चितपणे आढावा घेईन. विकासाच्या बाबतीत मी कधीच राजकारण करणार नाही. नागरिकांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे असे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
टेंभू योजनेच्या पाण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. 25 तारखेच्या पुढे माण नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.
- राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू प्रकल्प योजना
नीरा उजवा कालव्याचे नियोजनाप्रमाणे पाणी सुरू आहे. पाणी टंचाईच्या बैठकीतील तारीखेप्रमाणे नियोजन मात्र झाले नाही.
- ए. व्ही. पासलकर, उपाभियंता, नीरा उजवा कालवा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.