फलटण - लोक आमच्याकडे चर्चा करायला येतात; पण विकासाऐवजी वैयक्तिक व सामाजिक समस्यांबरोबरच "मोका'पर्यंत सर्व विषयांच्या ते चर्चा करतात. राजकारणात काय होईल ते सांगता येणार नाही, तथापि आमच्या जीवालाही धोका आहे, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे स्पष्ट केले.
शहरातील एका खासगी संगणक तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, श्यामसुंदर शास्त्री उपस्थित होते. राजकारण बदलत असून मूल्यांचा मागोवा घेता येत नाही. आम्ही पदावर असलो तरी आमच्या जीवालाही धोका आहे, याची जाणीव आम्हाला आहे, असे स्पष्ट करून रामराजे म्हणाले, 'जग आणि तंत्रज्ञान आज झपाट्याने बदलत असून युवकांनी पारंपरिक नोकरीच्या मागे न लागता स्थानिक पातळीवर शेती उत्पादित मालाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाजारपेठ व ग्राहक मिळवून द्यावेत. आमच्या पिढीने सगळे बदल पाहिले आहेत. पुढील पिढी तंत्रज्ञानाचा आधार घेत कोठे जाईल, याची कल्पना करता येत नाही. तेव्हा प्रगतीसाठी चर्चा विकासात्मक होणे आवश्यक आहे, अन्यथा समाज एकसंघ राहणार नाही.'' फलटण परिसरात आयटी हब करण्याची माझी इच्छा आहे, जेणेकरून येथील मुलांच्या हाताला काम मिळेल, त्याची पायाभरणी आजच्या कार्यक्रमातून झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार चव्हाण यांचे भाषण झाले.
लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा
आता मला खाली जायचे नाही, मला वर (दिल्ली) जायचे आहे, असे सांगत रामराजेंनी भाषणाच्या शेवटी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. जेवढा म्हणावा तेवढा साताऱ्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे मला आता दिल्लीतच जावे लागेल. मला वर घ्या म्हणजे माझा वेळ जाईल, असे त्यांनी भाषणात नमूद केले.
|