रोहित पवार म्हणतात, ..."असे' सरकार येणार माहिती असतं, तर "एलआयसी'नेच स्वतःची पॉलिशी काढली असती 

Rohit Pawar says, "If LIC would have done its own policy
Rohit Pawar says, "If LIC would have done its own policy

नगर ः एलआयसीला माहिती असतं केंद्रात "असे' सरकार येणार आहे, तर त्यांनी सर्वात प्रथम स्वत:चीच पॉलिसी काढली असती. इतकी वाईट स्थिती देशात भाजप सरकारने आणली आहे. सर्वच क्षेत्राचे खासगीकरण केले जात आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी नोंदवली आहे. 
आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्यांनी केंद्र सरकारच्या सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत ही टिपण्णी केली आहे. 

बजेटमध्ये गंडवागंडवी 
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ""विरोधक या नात्याने अर्थसंकल्पावर टीका होते आणि सत्ताधारी असल्यानंतर अर्थसंकल्पाने गुणगान केले जाते, हा प्रकार एक सामान्य नागरिक म्हणून सवयीचा झाला आहे. पण वर्ष संपताना आपणाला लक्षात येते की वर्षाच्या सुरवातीला बजेटमुळे किती मोठी कात्री आपल्या खिशाला लागली आहे. 
हे वर्ष संपत असताना देशात मंदीचे लोट येतील, बेरोजगारी वाढेल आणि अराजकतेची स्थिती निर्माण होईल असं चित्र आहे. सत्ताधारी म्हणून समर्थन आणि विरोधक म्हणून टीका करण्यापेक्षा तटस्थपणे बजेटकडे पाहिल्यास "गंडवागंडवी'चा सरकारचा प्रकार लक्षात येतो.'' 

बॅंकिंग क्षेत्र कुठे चाललेय? 
""लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतील, हे सांगायची वेळ येत असेल तर बॅंकींग प्रणाली कुठल्या स्थितीतून जात आहे हे लक्षात येईल. इन्कम टॅक्‍सच्या स्लॅबमध्ये सवलत दिल्याचं भासवलं असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करुन टॅक्‍समध्ये बेनिफिट घेणाऱ्यांना यापुढे तो मिळणार नाही. याला एका हाताने देणं आणि दुसऱ्या हाताने काढून घेणं असंच म्हणावं लागेल,'' असेही पवार म्हणतात. 

शून्य सोडून काही उरत नाही

""गरिबांबद्दल सरकार काय विचार करते, हे बजेटमधून लक्षात येईल. छोट्या गुंतवणूकदारांना बजेटमध्ये काय देण्यात आले तर शून्य सोडून काही उरत नाही. शिक्षणक्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यावर, सध्याच्या बेरोजगारीवर भाष्य करण्यात आलेले नाही. तरुणांच्या तोंडाला अप्रेंटिसशीपची पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं सांगून हमीभावाबद्दल बोलण्यात आलेलं नाही. आरोग्यासाठीच्या निधीत कपात केली आहे. कृषीचा विकास दर निच्चांकी आहे, त्याबाबत भरीव उपायोजना नाहीत. 
शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावला, हा इतिहास आहे. मात्र, केवळ शून्यच लोकांच्या हाती शून्य देण्याचा इतिहास या भाजप सरकारने रचला आहे,'' असेही निरीक्षण ते नोंदवतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com