पंढरपुरात होणार तुकाराम महाराज संत पिठाची उभारणी

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात तुकाराम महाराज संत पिठाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च होणार असून हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संत पिठाच्या उभारणी विषयी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सकाळशी बोलताना दिली.

डॉ. भोसले म्हणाले, वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तुकाराम महाराज संत विद्यापीठाची उभारणी करण्याविषयी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यानुसार  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या येथील जुन्या भक्त निवास च्या जागेवर संत पिठाची उभारणी केली जाणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या कामासाठी संमती दिली आहे. संतपीठाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संतपीठ उभारणी संदर्भातील घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. अध्यात्मिक राजधानी पंढरीत संतपीठ उभारण्याचे ऐतिहासिक काम आगामी काळात होईल असे डॉ.भोसले यांनी नमूद केले.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान भारतातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान करण्याच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. एक कोटीपेक्षा जास्त भाविक दर्शनाला जातात अशी देशात सुमारे पंधरा देवस्थाने आहेत. या सर्व देवस्थानांचा विचार केला तर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये तुलनेने वेगाने वाढ झाल्याचे दिसत आहे. मंदिर समितीचे उत्पन्न गेल्या दोन वर्षात दुपटीने वाढले असूना आता ते 31 कोटी रुपये झाले आहे. पुढील दोन वर्षात ते आणखी वाढून पन्नास कोटी पर्यंत जाईल आणि त्या माध्यमातून भाविकांना अनेक चांगल्या सुविधा देता येतील असा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाच्या रांगेत तासन् तास तिष्ठत थांबावे लागते. त्यामुळे तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शन व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. टोकन पद्धत सुरू करण्याआधी सध्या चंद्रभागा घाट घाटापर्यंत असलेला दर्शन रांगेचा स्कायवॉक पुढे वाढून पत्रा शेड पर्यंत करणे आणि पत्रा शेड जवळ नवीन सुसज्ज दर्शन मंडप बांधणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन स्काय वॉक आणि दर्शन मंडपाचे आराखडे तयार करण्यात आले असून लवकरच या दोन्ही कामांना सुरुवात केली जाणार आहे.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने बोलताना डॉ. भोसले म्हणाले, यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सुलभतेने व्हावी यासाठी मंदिर समितीची यंत्रणा सज्ज झाली आहे.रांगेतील वारकऱ्यांच्या पायांना त्रास होऊ नये यासाठी आठ किलोमीटर मेटिंग आणि पाऊस व उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण दर्शन रांग आच्छादित करण्यात आली आहे. मोफत जेवण आणि फराळ वाटपाची व्यवस्था दोन संस्थांच्या मदतीने करण्यात आली असून तब्बल 25 लाख लिटर मिनरल वॉटरचे मोफत वाटप केले जाणार आहे.

सुमारे 85 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या भक्त निवास मध्ये भाविकांची निवासाची उत्तम व्यवस्था होऊ लागली आहे.आषाढी यात्रेत लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना गर्दीमुळे मंदिरात जाऊन श्रीविठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. हे लक्षात घेऊन भक्तनिवास सह शहरात 16 ठिकाणी मोठ्या पडद्यावर श्रीविठ्ठल-रुक्मिणी च्या गाभाऱ्यातील थेट चित्रीकरण प्रदर्शित केले जाणार आहे. प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आणि व्यवस्थापक बालाजी  पुदलवाड यांनी भाविकांना सुविधा देण्यासाठी अनेक उपक्रम निस्वार्थ भावनेने राबवल्याचे सांगून श्री भोसले यांनी या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com