रखडलेल्या ‘मराठवाडी’वर ‘प्रधानमंत्री’ची कृपा

रखडलेल्या ‘मराठवाडी’वर ‘प्रधानमंत्री’ची कृपा

ढेबेवाडी - तब्बल २० वर्षांपासून रखडलेले मराठवाडी धरणाचे बांधकाम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. मध्यंतरी अर्ध्यातच गुंडाळण्याच्या स्थितीत असलेला हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील समावेशानंतर आता मार्गी लागण्याची आशा दिसू लागली आहे. 

मराठवाडीजवळ वांग नदीवर १९९७ मध्ये धरणाच्या बांधकामाची कुदळ मारण्यात आली. २.७३ टीएमसी क्षमतेच्या प्रकल्पाचे लाभक्षेत्र कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील विविध गावांत असून, टेंभू योजनेलाही येथून एक टीएमसी पाणी देण्याचे नियोजन आहे. सुमारे १९२२ खातेदार धरणामुळे बाधित होत असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरवातीला कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत तीन, तर सांगली जिल्ह्यांत १२ गावठाणे विकसित करण्यात आली. आता त्यामध्ये धरणाजवळ नव्याने होणाऱ्या आणखी दोन गावठाणांची भर पडली आहे. विविध गावठाणांमध्ये धरणग्रस्त राहण्यास गेले असले, तरी पुनर्वसनाचा प्रश्‍न रेंगाळल्याने अजूनही अनेक कुटुंबांनी गाव सोडलेले नाही. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक मुक्ती दल, मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखालील कृती समिती आदी संघटनांनी ठिय्या, मोर्चे, मेळावे, पेरणी आंदोलन, जलसत्याग्रह आदींद्वारे लढाई सुरू ठेवल्याने विविध  प्रश्‍नांचा निपटारा झाला. यामध्ये अनेक धरणग्रस्तांना प्रसंगी पोलिसांच्या लाठीमाराला आणि कारवाईलाही सामोरे जावे लागले. कधी धरणग्रस्तांचा विरोध तर कधी निधीचा तुटवडा यामुळे धरणाचे बांधकाम २० वर्षे रखडत राहिले.

जमीन गेली आणि पाणीही नाही अशी त्यांची बिकट स्थिती झाली. धरणाच्या लाभक्षेत्रात कोल्हापूर पद्धतीचे दहा बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन असून, आठ बंधारे पूर्ण झाले आहेत. दोन दशकात धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांची तड लावण्यासाठी शासन स्तरावरून बैठकांचे सोपस्कार सुरू होते. अलीकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत धरणाचा समावेश झाल्यानंतर त्याला मोठी गती आली. संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांसमवेत लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही सतत पाठपुरावा करीत असल्याने आता उर्वरित बऱ्याच प्रश्‍नांची तड लागून प्रकल्पाचा मार्ग मोकळा होत चालला आहे.

प्रकल्पासाठी ५० कोटींची तरतूद
यावर्षी प्रकल्पासाठी ५० कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे. बांधकाम सुरू करताना सुरवातीला भिंतीवर २० वर्षांपासून वाढलेली झाडेझुडपे काढून साफसफाई करावी लागणार आहे. सांडवा, माती भराव, पिचिंग, इंटकवेल, गेट आदी कामे अद्याप शिल्लक आहेत. डिसेंबर २०१९ पर्यंत हे धरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित दोन बंधाऱ्यांची कामेही लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे कृष्णा खोऱ्याच्या सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com