पावसाअभावी खरिपाच्या पिकांची परिस्थिती चिंताजनक

crops
crops

पांगरी (सोलापूर) - परिसरात गेल्या महिन्यापासून एक ही पाऊस न झाल्याने खरिप हंगामातील प्रमुख पिक सोयाबीनसह अन्य पिके सुकायला लागली आहेत. जोरदार वारे व उन्हाच्या तीव्रतेने खरिप पिके हातातून जात असल्याने शेतकर्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. 

पांगरीसह कारी, चिंचोली, पांढरी, घोळवेवाडी, उक्कडगाव, गोरमाळे, घारी, पूरी, जहानपूर, ममदापूर, जहानपूर, शिराळे यासह आसपासच्या परिसरात खरिप पेरणीपासून एक ही दमदार पाऊस झाला नाही. सध्या सोयाबीनसह अन्य पिकांना फुले लागण्याचा कालवधी असल्याने यातच पाऊसाने ओढ दिल्याने पिकाच्या उत्पादनात फटका बसणार असल्याची भिती शेतकर्यामधून व्यक्त होत आहे. एक ही मोठा पाऊस न होता केवळ अधूनमधून रिमझिम झालेल्या पाऊसाने व वातावरणातील आर्द्रतेने पिके चांगली दिसत होतो. मात्र आता रोज उन्हाच्या तीव्रतेने व जोरदार वारे वाहत असल्याने पिके सुकू लागली आहेत. येत्या आठ दिवसात पाऊस न पडल्यास पिके हातून जातील असे शेतकर्यांमधून बोलले जात आहे.

मागील वर्षी ही याच कालवधीत पावसाने दीड मारल्याने शेतकर्यांना खरिप उत्पादनात मोठा फटका सहन करावा लागला होता.
 यावर्षी ही त्याची पुनरावृत्ती होत आहे.

पावसाळा हंगामाच्या सुरूवातीस एक जूनला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर अधून मधून पावसाची रिपरिप चालू राहिल्याने शेतकर्यानी खरिप हंगामातील मुख्य पिक सोयाबीन, उडीद, तूर, मूग आदी पिकाबरोबर कांदा लागवडीसाठी बियाणे टाकण्यात आले. त्यानंतर अधूनमधून पावसाची रिमझिम होत राहिल्याने व वातावरणातील आर्द्रतेने बियाणांची उगवण चांगल्या प्रकारे झाली. त्यानंतर पाऊसाच्या जवळपास आठ ते दहा दिवसांच्या उघडीपनंतर उर्वरित शेतकर्यानी पेरणी केली. दीड महिन्यांचा कालावधी लोटला तर दमदार पाऊस नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कांदा रोपे लागवडीसाठी योग्य झाली असताना ही पाऊसअभावी कांदा लागवड ठप्प झाली आहे. सध्या वातावरणात उष्णता निर्माण झाली असून दुपारच्या वेळी पिके कोमेजून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोयाबीन, उडीद, मूग पिकांसाठी फुले लागण्याचा कालवधी असून, यामध्ये पाऊसाची गरज आहे. 

पाऊस नसल्याने नदीनाल्यांना पाणी वाहिले किंवा कोठे ही पाणी साठून राहिले नाही. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून येत नाही. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खरिप हंगाम वाया जातो की काय अशी भिती निर्माण झाली आहे. शेतामधील पिकांच्या आंतरमशागत करून शेतकरी वरूण राजाची प्रतिक्षा करत आहे.

हा परिसर बहुतांश डोंगराळ भागालगत असल्याने हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत. त्यामुळे सलग आठ -दहा दिवस पाऊस नाही पडला तर पिके धोक्यात येऊन उत्पादनात कमालीची घट सहन करावी लागणार आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊसाचे झाल्याने अनेक शेतकरी ऊस, द्राक्षे, भाजीपाला क्षेत्राकडे वळले आहेत. मात्र पाऊसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुर्णपणे धास्तवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com