सोलापूर - मागील वर्षात राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने शांततेत मोर्चे काढण्यात आले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उपसमितीने दिलेल्या निर्देशानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे रुपडे बदलले आहे. जुन्या असलेल्या दोन योजना बंद करून नव्या तीन योजनांचा समावेश त्यात केला आहे. त्यामध्ये गट प्रकल्पाला बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुणांना आर्थिकसाह्य पुरविण्याच्या दृष्टीने या महामंडळामार्फत बीज भांडवल कर्जयोजना व गट प्रकल्प कर्जयोजना राबविण्यात येत होत्या. या योजनांना मागणी नसल्याने व लाभार्थ्यांनी कर्जाची रक्कम परतफेड न केल्याने शासनावर कर्जमाफी करण्याची वेळ आली. या दोन योजनांचा लाभ जास्त जणांनी न घेतल्यामुळे त्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या अस्तित्वात आलेल्या तीन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजनांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास व्याजाची रक्कम 12 टक्क्यांपर्यंत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारलिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.
दहा ते 50 लाखांपर्यंत कर्ज
गट कर्जव्याज परतावा योजनेत दहा ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. यात 15 लाखापर्यंतचे कर्ज घेतलेल्या गटाने वेळेत हप्ता भरल्यास 12 टक्के व्याजदराने व्याजाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातील. व्याजाची रक्कम दरमहा महामंडळातर्फे जमा केली जाईल. गट प्रकल्प कर्ज योजनेत पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना 10 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नव्या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी अर्ज करणे गरजेचे आहे. सरकारने घातलेले निकष पूर्ण करून या तीन योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.
|