बळिराजाने जगावे की मरावे!
सोलापूर - दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांच्या याद्या बॅंकांना मिळाल्याच नाहीत. बॅंक अधिकाऱ्यांनी कर्जमाफीची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून कर्जवसुली सुरू केली आहे. एकीकडे सातबारा उताऱ्यावर बोजा, तर दुसरीकडे कर्जमाफी होऊनही बॅंकांची वसुली सुरूच आहे. त्यामुळे आता जगावे की मरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामात बॅंकांनी प्राधान्याने कर्जवाटप करावे, असे सरकारने निर्देश दिले; परंतु मागील खरीप हंगामापासून नवे कर्ज नव्हे, तर उताऱ्यावरील बोजा कधी कमी होणार, याची चिंता शेतकऱ्यांना दररोज सतावत आहे. दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्यांसाठी ओटीएस (एकरकमी परतफेड योजना) योजना लागू केली. त्याची मुदत 30 जूनपर्यंतच आहे. दीड लाखावरील रक्कम संबंधित बॅंकांमध्ये भरल्याशिवाय त्यांना दीड लाख रुपये मिळणार नाहीत. दीड लाखावरील रक्कम भरण्याची तयारी असूनही याद्या न आल्याने शेतकऱ्यांना बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
पतीच्या निधनानंतर वारसदार म्हणून मी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा उपनिबंधकांकडे गेले. त्यांना अर्ज दिले; परंतु अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या यादीत नाव आले नाही. दहा-अकरा महिन्यांपासून बॅंकेत हेलपाटे मारतेय. तत्पूर्वी आर्थिक वर्षाचे निमित्त सांगून बॅंक अधिकाऱ्यांनी कर्जाची रक्कम ऊसबिलातून कपात केली. त्यामुळे आता जगावे की मरावे, असा प्रश्न कुटुंबासमोर आहे.
- मुक्ताबाई गडदे, हिंगणी निपाणी, ता. मोहोळ
एकूण अर्जदार शेतकरी - 78,32,359
कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी - 68,90,624
कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकरी - 31,26,703
आतापर्यंत मिळालेली रक्कम - 15,549 कोटी
ओटीएससाठी पात्र शेतकरी - 7,38,317
ओटीएस यादीच्या प्रतीक्षेतील शेतकरी - 4,31,728
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.