सोलापूर - जिल्ह्यात कृत्रिम पर्जन्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्यास केंद्रीय विज्ञानमंत्री हर्ष वर्धन यांनी संमती दिल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. पाणीटंचाईसह अनेक समस्यांना कायम तोंड द्यावे लागते. यातून सुटका होण्यासाठी जिल्ह्यात कृत्रिम पर्जन्य केंद्र उभारणीची मागणी देशमुख यांनी केली होती. त्याची दखल केंद्राने घेतली आहे. दोन संशोधक यानांपैकी एक कृत्रिम पावसाचे बीजारोपण करेल, तर दुसरे पावसाचे नमुने गोळा करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांसाठी राबविला जाणार आहे. या प्रकल्पामुळे हवामानाचा अंदाज खात्रीपूर्वक वर्तविण्यात येईल. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. हा अंदाज कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचविला जाणार आहे.
प्रकल्पाचे सचिव एम. राजीवन म्हणाले, 'अवर्षणग्रस्त जिल्ह्याची संशोधनासाठी निवड झाली आहे. हे नमुने या भागातून कृत्रिम पर्जन्यरोपणाचा परिणाम अभ्यासण्यासाठी व हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी संकलित करण्यात येतील.''
|