सोलापूर - सोलापूर विद्यापीठाअंतर्गत अभियांत्रिकी, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसह इतरांनादेखील लोकशाहीचे धडे मिळणार आहेत. सर्वच विद्यापीठात लोकशाही, निवडणुका व सुशासन हा विषय पदवीस्तरावर सक्तीचा करण्यात येणार असून, काही विद्यापीठात 2017-18 पासून तर काही विद्यापीठात 2018-19 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रात लोकशाही, निवडणुका व सुशासन हा विषय अभ्यासाला असणार आहे. पदवी मिळविण्यासाठी या विषयात विद्यार्थ्याने उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
अभ्यासातून नागरिकांना लोकशाहीचे महत्त्व कळावे यासाठी या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. एका भारतीयांचे त्याच्या देशाप्रती योगदान देणे महत्त्वाचे ठरते. यातूनच समाजाच्या प्रगती होते. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव मतदार संघात नोंदविण्याची सक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे.
यासोबतच लोकशाही प्रक्रिया, निवडणूक यांचे ज्ञान देण्याच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा ठरणार आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही लोकशाहीचे विविध पैलू समजण्यास मदत मिळणार असल्याचे या अभ्यासक्रमाच्या उद्देशिकेत सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 12 (7) अन्वये विद्यापरिषदेतर्फे तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी लोकशाही, निवडणुका व सुशासन हा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या विषयाचे अभ्यासक्रमाची रचना देखिल तयार करण्यात आली असून, विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान शाखा, अंतर विद्याशाखा यांना हा अभ्यासक्रम राबविणे बंधनकारक असणार आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राला हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.
|