सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची "खिचडी' 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची "खिचडी' 

सोलापूर : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता जिल्ह्याला वेध लागले आहे, ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीकडे. यंदा होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीला राजकारणाचे वेगवेगळे पदर आहेत. जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत "खिचडी' होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही "महाविकास' आघाडी करण्याचे प्रयत्न यशस्वी होतात का? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव झाले आहे. 68 सदस्यांच्या सभागृहात 10 सदस्य अनुसूचित जातीचे आहेत. त्यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. या 10 सदस्यांपैकी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणाला राज्याच्या राजकारणाची किनार लागणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असला तरी आपल्या इतर मित्रपक्षांना आपलेसे करण्यात त्यांना यश येणार का? याबाबत उत्सुकता आहे. महाविकास आघाडीमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांची शिवसेना येणार का? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले कॉंग्रेसचे माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडून वेगळेच संकेत मिळत आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षाशिवाय स्थानिक आघाड्यांच्या सदस्यांची संख्याही लक्षात घेण्यासारखी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 23, भाजपकडे 14, कॉंग्रेसकडे सात, शिवसेनेकडे पाच या प्रमुख पक्षाच्या सदस्यांचा आकडा 49 इतका होता. त्यामध्ये भाजपचे 14 सदस्य कमी केले असता हा आकडा 35 इतका होता. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत येणे शक्‍य आहे. मात्र, या महाविकास आघाडीसोबत माजी आमदार नारायण पाटील यांच्या चार सदस्यांनी न जाण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकत नाही. अशावेळी सांगोल्यातील स्थानिक आघाडीच्या मदतीने महाविकास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकतो. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप मिळून सत्ता स्थापन करू शकतील, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. राज्याच्या राजकारणापेक्षा स्थानिक गटातटांची भूमिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत महत्त्वाची ठरणार आहे. 

प्रमुख चार पक्षांचा विचार सोडल्यास स्थानिक आघाड्यांकडेही बऱ्यापैकी संख्याबळ आहे. त्यामध्ये परिचारक विकास आघाडीकडे तीन, भीमा आघाडीकडे तीन, आवताडेंच्या जनहित आघाडीकडे तीन असे संख्याबळ आहे. कोणत्याच पक्षाकडे बहुमत नसल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रवादी व भाजप एक होण्याची चर्चा केली जात आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या आघाडीचीही चर्चा जोरात सुरू आहे. तिसऱ्या आघाडीच्या चर्चेसाठी कोण पुढाकार घेणार याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे, त्यामुळे या निवडीत बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या सदस्यांची भूमिका काय हे पाहणे गरजेचे आहे. या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाला प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

तिसऱ्या आघाडीच्याही हलचाली 
माजी मंत्री म्हेत्रे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री गणपतराव देशमुख, माजी मंत्री सोपल, मोहोळची भीमा विकास आघाडी, आवताडेंची जनहित आघाडी, माजी आमदार पाटील यांची शिवसेना, परिचारकांची विकास आघाडी या स्थानिक पातळीवरील सगळ्या आघाड्या एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमके काय होईल, याचा अंदाज कोणत्याही भविष्यकाराला बांधता येणार नाही हे मात्र निश्‍चित! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com