"बिनविरोधसाठी राष्ट्रवादीच्या अहंकारी नेत्यांनी साधी चर्चादेखील केली नाही; अन्यथा आम्ही विचार केला असता !' 

Devendra_Fadnavis
Devendra_Fadnavis

पंढरपूर (सोलापूर) : सुरवातीच्या काळात कोरोनामुळे प्रचार सभा घेऊ नये, असा आमचा विचार होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठ्या मोठ्या सभा घेतल्यानंतर आम्हाला देखील प्रचार करणे गरजेचे होते. जास्त गर्दी होऊ नये यासाठी एक- दोन सभा न घेता सात सभा आम्ही घेत आहोत. खरे तर कोरोनाच्या काळात सभा घ्याव्या लागल्या नसत्या तर ते अधिक चांगले झाले असते. परंतु त्याला पर्याय नसल्याने आम्हाला सभा घ्याव्या लागत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याविषयी कोणताही प्रस्ताव आला नव्हता, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले. 

मंगळवेढा येथे श्री. आवताडे यांच्या फार्म हाउसवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ओबीसीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती. त्या केसमध्ये जेव्हा हे सरकार आले तेव्हा तीन जिल्ह्यांची निवडणूक घेण्याची कंडिशनल परवानगी कोर्टाने दिली होती. तत्काळ एक मागासवर्गीय आयोग नेमा, इंपेरिकल डाटा तयार करा आणि त्या आधारावर हे जस्टिफाय करा. दुसरे त्यांनी प्रपोशनल रिप्रेझेंटेशन द्या, असे सांगितले होते. त्या संदर्भातील कायदा आम्ही ऑर्डिनन्सद्वारे केला होता. या सरकारने तो कायदा लॅप्स केला. न्यायालयाने जे सांगितले होते त्यापैकी काहीच केले नाही. म्हणून शेवटी न्यायालयाने ओबीसी आरक्षण हे निवडणुकांपुरते स्थगित केले. रद्द केले. सरकार आयोग तयार करेल आणि इंपेरिकल डाटा तयार करेल तेव्हाच निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देता येईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. परंतु सरकारने काहीच केलेले नाही. आता कोरोनामुळे लोकल बॉडीच्या निवडणुका होत नाहीयेत. परंतु पुढे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लागू राहील. या सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसींना जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळाले होते ते अडचणीत आले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

संजय राऊत काहीही बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला मी कधीच उत्तर देत नाही. सर्वात जास्त पीपीई किट महाराष्ट्राला मिळाल्या, सर्वात जास्त मास्क केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळाल्या, सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळाल्या. एकीकडे लसीकरणात महाराष्ट्र अव्वल आहे. देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असे पत्रक राज्य सरकारकडून काढले जाते आणि दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. आम्ही मदत करायला निघालेलो असताना जो उठतो तो सोम्या गोम्या केवळ राजकारण करतो आहे. हे योग्य नसल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. 

कोरोनाच्या संदर्भात स्ट्रॅटेजिकली कुठेतरी आपण कमी पडलो आहोत. याचे कारण मध्यंतरीच्या काळात केसेस कमी झाल्या असताना त्या वेळी दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त झालेला होता. त्यावेळी आपण नवीन तयारी केली नाही. त्यामुळे आज महाराष्ट्रात बेड्‌स नाहीत. व्हेंटिलेटर नाहीत. ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत त्या वेगाने व्यवस्था वाढवण्याची गरज असताना तसे प्रयत्न होताना दिसत नाही. 

पोटनिवडणुकीत जर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (कै.) भारत भालके यांच्या पत्नीस उमेदवारी देऊन आमच्याकडे बिनविरोधसाठी प्रस्ताव दिला असता, तर आम्ही विचार केला असता. राष्ट्रवादीच्या अहंकारी नेत्यांनी आम्हाला साधा फोन करून तशी चर्चा देखील केली नाही. त्यामुळे निवडणूक लागली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना वातावरण अतिशय चांगले असून ते नक्की विजयी होतील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com