Diwali Festival : मोहोळच्या बाजारपेठेत चायना आकाश दिव्यांची क्रेझ

मात्र बाजारपेठ मरगळलेलीच
Diwali Festival
Diwali Festival sakal
Summary

मात्र बाजारपेठ मरगळलेलीच

मोहोळ : तालुक्यात कमी पडलेला पाऊस, ज्या भागात पडला त्या भागात झालेले शेतकऱ्याचे नुकसान, पैसे खात्यावर असूनही बँकांच्या सुट्ट्यामुळे ते न वापरता येणे या सर्व कारणामुळे मोहोळ येथील बाजारपेठेत मंदीचे सावट दिसत असून बाजार पेठ मरगळलेल्या अवस्थेतच दिसत आहे. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चायना आकाश दिव्याची क्रेझ दिसून येत आहे. ज्यांच्याकडे पैशाची उपलब्धता आहे त्यांनी तयार कपडे, किराणा साहित्य, मोबाईल शॉपी आधी सह अन्य दुकानात गर्दी केल्याचे दिसत आहे. चालू वर्षी नेहमीच्या किराणा दुकाना ऐवजी "मॉल" ला गर्दी जादा दिसत आहे.

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावा मुळे सार्वजनिक उत्सव बंद झाले होते, मात्र प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजार पेठेत मोठी गर्दी वाढली आहे. चांगली विक्री होईल या हिशोबाने विविध व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला आहे. टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने ऐन दिपवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम वर्ग केली आहे, बँकेत पैसे जमा झाले आहेत मात्र बँकेला सलग सुट्ट्या असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. सलग दोन दिवस बँका चालू ठेवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यां मधून होत आहे.

सध्या बाजारात चायना आकाश दिव्यांची क्रेझ दिसून आली. 120 रुपयापासून ते एक हजार रुपया पर्यंत आकाश दिव्याच्या किमती आहेत. फाडीव कपडे घेऊन शिवण्यासाठी मोठा खर्च होतो. त्या ऐवजी तयार कपडे खरेदी करण्याकडे नागरिकांचा वाढता कल दिसत आहे. दिपवाळीच्या सणात कुंभार बंधू ही मागे नाहीत. त्यांनी गवळणी, सैनिक व किल्ले तयार करून विक्रीसाठी ठेवले आहेत. अडीचशे रुपये पासून ते सातशे रुपया पर्यंत तयार किल्ल्यांच्या किमती आहेत.

या वरील वस्तू बरोबरच एलईडी, दूरचित्रवाणी संच, फ्रीज, या वस्तूंनाही मोठी मागणी आहे. या वस्तूंच्या दरात सरासरी सात ते दहा टक्के वाढ झालेली आहे. डबल दरवाजाचा फ्रिज, एअर कुलर, व मोठा एलईडी या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे या वस्तूंचे विक्रेते दिनेश काटकर यांनी सांगितले. मोबाईल विक्रेते पिंटू सादिगले म्हणाले, सध्या दुकानात आठ हजारा पासून ते दीड लाख रुपया पर्यंतच्या किमतीचे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु सरासरी 20 हजार रुपया पर्यंतच्या मोबाईलला मागणी आहे.

सध्या दिवाळीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही आले आहेत. परंतु सलग सुट्ट्या असल्यामुळे ते खर्च करणे अडचणीचे झाले आहे. अनेक शेतकऱ्याकडे पैसे काढण्याची सुविधा नाही त्यामुळे दोन दिवस सलग बॅंका सुरू ठेवाव्यात. ही दोन दिवसाची सुट्टी पुढे भरून काढावी

- हनुमंत कसबे,आरपीआय नेते मोहोळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com