सेंद्रिय गुळाचा 'यादवबाग' ब्रॅंड! मारापूरच्या हरिभाऊ यादवांचा प्रयोग

सेंद्रिय गुळाचा 'यादवबाग' ब्रॅंड ! मारापूरच्या हरिभाऊ यादवांचा प्रयोग; ऊसही नैसर्गिक पद्धतीचा
सेंद्रिय गुळाचा "यादवबाग' ब्रॅंड !
सेंद्रिय गुळाचा "यादवबाग' ब्रॅंड !Canva
Summary

मारापूर (ता. मंगळवेढा) येथील हरिभाऊ यादव यांनी थेट गूळ निर्मिती उद्योगात उतरण्याचं धाडस केलं, तेही सेंद्रिय पद्धतीच्या गूळनिर्मितीत.

सोलापूर : घरची वर्षानुवर्षाची ऊसशेती (Sugarcane cultivation), पण उसाला मिळणाऱ्या कमी दरामुळे मारापूर (ता. मंगळवेढा) येथील हरिभाऊ यादव (Haribhau Yadav) यांनी थेट गूळ निर्मिती उद्योगात (Jaggery manufacturing industry) उतरण्याचं धाडस केलं, तेही सेंद्रिय पद्धतीच्या गूळनिर्मितीत. सुरवातीला अनेक अडचणी आल्या, पण त्यातूनही मार्ग काढत त्यांनी सेंद्रिय गूळ निर्मितीतील 'यादवबाग' नावाचा यशस्वी ब्रॅंड तयार केला आहे....

मंगळवेढ्यापासून अवघ्या आठ किलोमीटरवर मारापूर हे माण नदीच्या काठावर वसलेलं आणि निसर्गदत्त देणगी लाभलेलं गाव आहे. पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे या भागात ऊसाची शेती सर्वाधिक होते, याच गावात हरिभाऊ यादव यांची 21 एकर शेती आहे. आई-वडील, पत्नी, छोटा भाऊ, भावजय असे त्यांचे एकत्रित कुटुंब. वडील मारुती यादव सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. 21 एकर शेतीत सध्या त्यांच्याकडे नऊ एकर ऊस आहे. आडसालीच्या लागणीनंतर दरमहा महिनाभराच्या अंतराने ते ऊस लागवड करतात. साधारण 18 एकरपर्यंत ऊस त्यांच्याकडे असतो. हरिभाऊ घरात मोठे. 1995 साली हरिभाऊ यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर ते राजकारणात उतरले. जवळपास 2004 पर्यंत आठ-दहा वर्षे ते त्यात सक्रिय होते. पण त्यातून हाती काहीच लागलं नाही. उलट आर्थिक नुकसान होत राहिलं. त्यामुळे त्यांनी घरच्या शेतीकडे वाट वळवली.

सेंद्रिय गुळाचा "यादवबाग' ब्रॅंड !
पुण्यात उभारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय! शासनाची मान्यता

सुरवातीला ऊसशेती केली. पण ती परवडेना, त्यावेळी दुष्काळही पडला. त्यामुळे 2012-13 मध्ये ते मुंबईला गेले. तिथे बांधकाम व्यवसायाची छोटी-मोठी कंत्राटं घेतली. त्यातही अपयश मिळाल्यानं शेवटी 2015 मध्ये पुन्हा त्यांनी गाव गाठलं आणि शेतीत नव्यानं सुरवात केली. त्यावेळी मंगळवेढ्यात कृषिक्रांती फार्मर्स क्‍लबच्या माध्यमातून काही तरुण शेतकरी एकत्र आले. त्यात हरिभाऊही सहभागी झाले. त्यावेळी मोठ्या धाडसानं शेडनेटसारख्या हायटेक शेतीत हा क्‍लब उतरला. त्यावेळी सर्वांनी मिळून पहिल्यांदा ढोबळी मिरची केली. प्रत्येकाला चांगलं उत्पन्न मिळालं. त्यात हरिभाऊंनाही एकरातून सहा-सात लाखाचं उत्पन्न मिळालं. तेव्हा त्यांचा उत्साह वाढला आणि ते पूर्णवेळ शेतकरी झाले.

गूळनिर्मितीचा टर्निंग पॉइंट

शेडनेटमध्ये ढोबळी मिरची केली. पण त्यात कराव्या लागणाऱ्या रासायनिक औषधांच्या फवारण्या त्यांच्या पचनी पडल्या नाहीत. हे चुकीचं आहे, असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. त्याचवेळी आपण वेगळं काही तरी करावं, पण आता केलं तर सेंद्रिय पद्धतीच्या शेतीतच, हे त्यांनी ठरवलं. तेव्हा घरची वर्षानुवर्षाची ऊसाची शेती आणि त्याला मिळणारा दर, यामुळे आर्थिक गणित जुळत नव्हतं. त्यामुळे घरचा ऊस उपलब्ध आहे, तर सेंद्रिय पद्धतीच्या गूळनिर्मितीत उतरावं, असा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी हे सगळंच कठीण होतं. पण त्यांनी निश्‍चय केला. घरच्यांनाही त्यांनी त्याचं महत्व पटवून दिलं आणि मध्ये त्यांच्या गूळ उद्योगाचा श्रीगणेशा झाला. खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी हा टर्निंग पॉइंट ठरला.

दोन लाखात प्रकल्प

गूळनिर्मितीसाठी पटवर्धन कुरोलीहून ऊस गाळण्यासाठी 80 हजार रुपयांचे इंजिनवरील क्रशर खरेदी केले. दिवसभरात दहा टनापर्यंत गाळप करण्याची त्याची क्षमता आहे. शेतातच त्यासाठी एक शेड उभारला. त्यात रस उकळण्यासाठी साडेतीनशे लिटर क्षमतेच्या दोन कढई बसतील, अशा दोन चुलवण तयार केल्या. या कढई ही जुन्याच घेतल्या. त्याच्या बाजूला गुळासाठी वाफे तयार केले आणि शेडच्या बाजूलाच क्रशर ठेवला. साधारण हे सर्व साहित्य आणि शेडसाठी एक लाख 20 हजार रुपये आणि इंजिनचे 80 हजार रुपये असा दोन लाख रुपयांचा खर्च आला. पैशाची अडचण होती, पण कल्पतरु बचत गटातून त्यावेळी कर्ज काढले.

सेंद्रिय गूळनिर्मिती प्रक्रिया...

  • पहिल्यांदा क्रशरवर उसाचे गाळप करून घेतले जाते

  • त्यानंतर त्याचा रस थेट कढईत ओतला जातो

  • कढईवर रसाला चांगली उकळी दिली जाते

  • त्यानंतर त्याच्यातून मळी काढली जाते

  • नंतर या रसात औषधी गुणधर्म असणारी रानभेंडी आणि घट्टपणा येण्यासाठी चुना टाकला जातो

  • बाकी कोणत्याही रसायनाचे त्यात मिश्रण केले जात नाही

  • थेट वाफ्यामध्ये ते थंड करायला ठेवले जाते

  • त्यानंतर अर्धा किलो, एक किलो आणि पाच किलो या वजनानुसार गुळाची ढेप तयार केली जाते

  • हंगामात मागणीनुसार काकवीही तयार केली जाते

  • नैसर्गिकरीत्या पिकवलेला ऊस

  • सेंद्रिय गूळ निर्मितीसाठी ऊसही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलाच आवश्‍यक असल्याने त्यांनी संपूर्ण नऊ एकर उसाची शेती त्यावेळी पासून सेंद्रिय पद्धतीने पिकवायला सुरवात केली.

  • सुरवातीला एक-दोन वर्षे अडचण आली, पण आता पूर्णपणे रसायनमुक्त ऊस पिकवला जातो आहे.

  • प्रामुख्याने 8005 या वाणाची लागवड होते, आडसाली उसाची लागवड ते करतात.

  • त्यासाठी लागवडी आधी एकरी पाच ट्रॉली शेणखत आणि एक ट्रॉली गांडूळखत टाकले जाते.

  • ऊस लागवडीनंतर जीवामृत, गोकृपामृत आणि वेस्टडिकंपोझर प्रतिएकरी एकेक बॅरल सोडले जाते.

  • प्रत्येक पाण्याला साधारण आठ दिवसातून एकदा आलटून-पालटून ते सोडले जाते.

  • साधारण बारा महिन्यापर्यंत हाच डोस ठेवला जातो.

  • मे-जूनमध्ये आडसाली ऊसाची लागवड होते.

  • पण नोव्हेंबरमध्ये गूळ हंगाम सुरू होतो. साधारण मे महिन्यापर्यंत सहा-सात महिन्यांपर्यंत हंगाम चालतो.

  • या हंगामाच्या हिशोबाने उसाची उपलब्धता व्हावी, यासाठी आडसाली लागणीनंतर पुढे दरमहिन्याला आलटून-पालटून प्रत्येकी दोन-दोन एकराचे प्लॉट पाडले जातात.

  • त्यामुळे गाळपासाठी टप्प्या-टप्प्याने ऊस उपलब्ध होतो.

  • नैसर्गिकरीत्या पिकवत असल्याने एकरी साधारण 25 ते 30 टनापर्यंत उत्पादन मिळते.

सेंद्रिय पीक उत्पादकांचा गट

गूळनिर्मितीचा उद्योग करायचं ठरल्यानंतर कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) अंतर्गत कृषिक्रांती सेंद्रिय शेती स्वयंसाह्यता गटाची स्थापना त्यांनी केली. आत्माचे विक्रम सावंजी, शैलेंद्र पाटील यांनी त्यांना मार्गदर्शन केले. आपल्याबरोबरच गावातील आणि परिसरातील शेतकऱयांचा समावेश त्यात केला. त्यात उसाबरोबरच अन्य पीकेही सेंद्रिय पद्धतीने शेतकरी घेत आहेत. शिवाय हे शेतकरी आपापल्या परीने त्याचं मार्केटिंग करत आहेत. सध्या गूळ उद्योगासाठी त्यांना त्यांचा स्वतःचा ऊस पुरतो आहे, पण भविष्यात या शेतकऱ्यांकडूनही ऊस घेऊन उद्योग वाढवण्याचा त्यांचा विचार आहे.

सेंद्रिय गुळाचा "यादवबाग' ब्रॅंड !
आमदार शिंदेंच्या कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक : माजी आमदार पाटील

गुळाचे यादवबाग नावाने ब्रॅंडिंग

सेंद्रिय पद्धतीचा गूळ उत्पादित केला. पण त्याच्या मार्केटचा मोठा प्रश्न होता. त्यासाठी त्याचं मार्केटिंग, ब्रॅंडिंग महत्त्वाचं होतं. पण फक्त सेंद्रिय गूळ म्हणूनही चालणार नव्हतं. मग काहीसं वेगळं आणि हटके ब्रॅण्डिंगच्या उद्देशानं त्यांनी आपल्या आडनावावरूनच विशिष्ट पद्धतीचं यादवबाग सेंद्रिय गूळ असं नाव त्याला दिलं आणि अल्पावधीतच गुणवत्तेच्या बळावर यादवबाग सेंद्रिय गूळ असा त्याचा लौकिक वाढला. पाव किलो, अर्धाकिलो, एक किलो, पाच किलो अशा पॅकिंगमध्ये त्याची विक्री सुरु आहे. किरकोळ विक्रीत 100 ते 125 रुपये आणि घाऊक विक्रीत 90 रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री होते.

सोलापूर, पुणे, ठाणे मार्केट

गुळाचं उत्पादन सुरू झाल्यानंतर सुरवातीला आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रांना त्यांनी तो दिला. हळूहळू काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडे विक्रीसाठी दिला. सेंद्रिय पद्धतीनं तयार केला असल्यानं त्याची चव आणि त्याचं महत्त्व लक्षात घेऊन लोकांकडून मागणी वाढली. आता मंगळवेढा, सोलापूर, पुणे, ठाणे या शहरातही काही मॉल्स आणि दुकानदारांनी तो विक्रीसाठी ठेवला आहे. साधारण महिन्याकाठी दोन टन गुळाची विक्री होते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com