नागरिकांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊन आपले नंबर नोंदवावे व या यंत्रणेचा वापर करावा.
माढा (सोलापूर): काही भागात चोरी, दरोडा, अपघात यासारख्या घटना घडत आहे. अशावेळी संकटकाळात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास काही घटना घडत असल्याची माहिती मिळत आहे. अशावेळी तातडीने मदत करून नुकसान टाळता येत असल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणेची गरज व महत्त्व अधिक आहे. असे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी येथे आयोजित प्रात्यक्षिक कार्यशाळेत सांगितले.
याबाबत श्नी. गोर्डे म्हणाले की नागरिकांनी चोरी, दरोडा, अपघात यासारख्या व इतर संकटकाळात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या 18002703600 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास चोरी, दरोडा, अपघात यासारख्या घटना घडत असतानाच फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला तात्काळ मदत मिळून पुढील नुकसान टाळता येते. यासाठी नागरिकांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊन आपले नंबर नोंदवावे व या यंत्रणेचा वापर करावा. गेल्या 9 वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्हयातील लोकांनीही यात सहभागी व्हावे. ग्रामीण पोलिस व सोलापूर जिल्हा परिषदेच्या या संयुक्त उपक्रमाचे प्रात्यक्षिक येथील जगदाळे मंगल कार्यालयात दाखविण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, माढा पोलीस स्टेशन हद्दीतील 39 गावांमधील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी केले. यासाठी पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, महम्मद शेख तसेच सर्व बीट अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट
- घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
- गावातील कार्यक्रम / घटना विनाविलंब नागरिकांना एकाच वेळी कळणे.
- अफवांना आळा घालणे.
- प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
- पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
- संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
- गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्याची सोपी पद्धत
- संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600
- यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
- संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
- दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
- नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात.
- नियमाबाह्य दिलेले संदेश / अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
- एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
- वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या दहा किलोमीटरच्या परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
- घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.
- संदेश पुढील एक तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
- चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅक लिस्ट होतात.
- गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
- सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.