नदीच्या आणि गावाच्या पूर्वेकडील वस्त्यांवरील शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. त्या शेतकर्यांना दोरीला बांधून जेवण व दुधाचा पुरवठा केला जात आहे.
वाळूज (सोलापूर): संकटकाळात कोणती वस्तू उपयोगात येईल हे सांगता येत नाही. जसा 'बुडत्याला काडीचा आधार' तसा 'महापुरात अडकलेल्या देगावच्या (ता.मोहोळ) शेतकऱ्यांना दोरीचा आधार' महत्त्वाचा ठरत आहे. देगाव (ता.मोहोळ) येथील भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पश्चिमेकडील मातीचा भराव कालच्या महापुरात पुन्हा वाहून गेला आहे. त्यामुळे नदीच्या आणि गावाच्या पूर्वेकडील वस्त्यांवरील शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. त्या शेतकर्यांना दोरीला बांधून जेवण व दुधाचा पुरवठा केला जात आहे.
देगाव (ता.मोहोळ) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा मातीचा भराव मागील तीन चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसाने रविवारी (ता.26) पुन्हा एकदा वाहून गेला आहे. बंधारा वाहून जाण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे नदीच्या पूर्वेकडील वस्त्यांचा आणि शेतकर्यांचा गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासन सुस्तच आहे. शेतातील वस्त्यांवरील शेतकरी शनिवारी (ता.25) रात्री पासून नदीपलीकडे अडकून पडले आहेत. येथे अपघात होण्याची शक्यता असून जीवीत हानी झाल्यास त्यास संबंधीत विभाग जबाबदार असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकरी शिवाजी आतकरे यांनी दिली.
2016 साली झालेल्या जोरदार पावसाने या बंधाऱ्याची पश्चिमेकडील दगडी भिंत (विंग्जवॉल) आणि मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही अडीच ते तीन वर्षानंतर 2019 च्या एप्रिल-मे महिन्यात त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र दुरूस्ती कामात मोठा घोळ असल्याने दुरुस्ती नंतर येथील मातीचा भराव तीन ते चार फुट खचला व भिंतीला तडे गेले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये बंधाऱ्याची भींत पुन्हा त्याच ठिकाणी फुटून वाहून गेली होती. दोन्ही वेळा तात्पुरता मातीचा बांध घालून जेमतेम तीन ते चार फूटापर्यंत पाणी अडवून दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रयत्न झाला. 2016 ते 2021 या पाच वर्षाच्या कालावधीत वाळूज, देगाव, मनगोळी शिवारातील शेती बंधारा असून आणि चांगला पाऊस होऊनही तहानलेलीच राहीली आहे.
जिल्ह्यातील मोठ्या बांधाऱ्यांमध्ये या बंधाऱ्याची गणना होते. या बंधाऱ्यातील पाण्याचा फायदा देगाव, वाळूज, भैरववाडी, मनगोळी, तडवळे, मुंगशी, भागाईवाडी या सात ते आठ गावांतील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात फुटलेला बंधारा अद्याप दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. 2016 साली फुटलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तीन वर्ष वाट पाहावी लागली होती. गेल्या वर्षी फुटलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. यासाठी यावेळी किती वर्ष वाट पाहावी लागेल तो येणारा काळच सांगेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.