दुसऱ्या लाटेपर्यंत (31 मे) जिल्ह्यातील सुमारे अडीचशेहून अधिक मुलींचे विवाह झाल्याची चर्चा आहे.
सोलापूर : मुलीच्या विवाहाचे वय 18 तर मुलाच्या विवाहाचे 21 असतानाही लॉकडाउन (Lockdown) काळात अनेक पालकांनी बालवयातच मुलींचे विवाह लावून दिले. मुलींची शिक्षण घेण्याची इच्छा आणि त्यातून अधिकारी होण्याचे स्वप्न बालवयातच चुराडा होत असतानाही बाल कल्याण समिती (Child Welfare Committee) गप्पच आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बालवयात पालकांनी विवाह लावून दिले. मात्र, त्याचा शोध न घेता कार्यालयात बसून चाईल्ड लाईनवरून आलेल्या तक्रारीवरच त्यांनी लक्ष दिले. (in lockdown, many parents are forcing girls to marry at an early age)
सोलापूर शहर-जिल्ह्यात सातवी ते दहावीपर्यंतच्या मुलींची संख्या अंदाजित एक लाखांपर्यंत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून (मार्च 2020) ते आता दुसऱ्या लाटेपर्यंत (31 मे) जिल्ह्यातील सुमारे अडीचशेहून अधिक मुलींचे विवाह झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यापैकी 75 ते 80 बालविवाह रोखण्यात बाल कल्याण समितीला यश मिळाले आहे. ज्या वयात ती मुलगी शिक्षणाच्या माध्यमातून उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहते, ज्या वयात तिच्यावर संस्काराची गरज आहे, त्याच वयात पालक तिच्यावर संसाराची जबाबदारी टाकत आहेत.
कोरोनामुळे बेरोजगारी वाढली असून पालकांच्या हाताला काम नाही, घरातील सर्वजण निवांत आहेत. आता कामाच्या शोधात ते बाहेर पडू लागले असून त्यांना घरातील वयात आलेल्या मुलीची चिंता सतावू लागली आहे. दुसरीकडे शाळाही बंद असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. तर काही मुलींचे पालक कोरोना अथवा अन्य आजाराने मृत्यू झाले आहेत. त्यांचा सांभाळ त्यांची आई, मामा, आजी घेत आहेत. त्या मुलीला चांगले स्थळ आल्याने त्यांनीही शिक्षण घेऊन पुढे कुठे नोकरी लागते काय म्हणत बाल वयातच विवाह लावून देण्याला प्राधान्य दिल्याचेही चित्र आहे.
बालविवाह झालेल्या मुलींचा संघर्ष
सातवी, आठवी, नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलींना संसाराची फारशी माहिती नसते. घरात सर्वांसोबत आनंदाने राहणारी, पालकांना स्वत:च्या अडचणी हक्काने सांगणाऱ्या मुलीवर शाळा बंद असल्याने आणि शाळा पुढे कधी सुरू होईल हे अनिश्चित असल्याने पालक संसाराची जबाबदारी टाकत आहे. शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे वाढ न झालेल्या मुली कमी वयात नवजात बालकाला जन्म देत आहेत. त्यातच संपूर्ण सासरची जबादारी त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांचे हाल होतात. अशातूनच सासू, सासरा, नवऱ्यासोबतच्या भांडणाला तिला सामोरे जावे लागते. तिच्या आरोग्याच्या समस्याही लवकरच सुरू होतात, हे निरीक्षण आहे. तरीही, त्याचे ना पालकांना ना संबंधित विभागाला गांभीर्य, असेच चित्र पहायला मिळत आहे. (in lockdown, many parents are forcing girls to marry at an early age)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.