मोहोळ तालुक्‍यात पंचनाम्यास प्रारंभ; सुमारे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज 

Mohol Survey
Mohol Survey

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या विविध शेती पिकांचे, घरांचे व मृत जनावरांचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी विविध पाच विभागांतील सुमारे 175 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नजर अंदाजानुसार मोहोळ तालुक्‍यातील तीन हजार 200 हेक्‍टरवरील विविध पिके व फळबागा व अन्य धरून सुमारे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे पूर्ण झाल्यावरच खरे वास्तव समजणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. 

मोहोळ तालुक्‍यात 14 व 15 ऑक्‍टोबर या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे तालुक्‍यातून वाहत जाणाऱ्या भीमा, सीना व नागझरी नद्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले काहीच उपाययोजना करण्यास वेळ मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांची दुभती जनावरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी शिरले. त्यांची पडझडही झाली. या संकटामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. 

मोहोळ, सावळेश्वर व कामती या तीन महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. मात्र पावसाच्या व पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा निकष न लावता सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पुरामुळे तालुक्‍यातील नऊ बंधारे बाधित झाले आहेत तर दोन हजार 252 नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. 

पंचनाम्यांसाठीच्या पथकात गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला असून, या सर्वावर मंडळ निरीक्षकांचे नियंत्रण असणार आहे. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नसल्याचे तहसीलदार बनसोडे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com