लालपरी येतेय रुळावर; "या' आगारातून होतेय दररोज एक हजारपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक 

St Bus
St Bus

बार्शी (सोलापूर) : तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाने लॉकडाउन शिथिल करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस वाहतूक सुरू करण्यास परवानगी देताच रस्त्यावर पुन्हा लालपरी धावू लागली आहे. लालपरी धावू लागल्याने प्रत्येक नागरिकाच्या मनात विश्वास तर निर्माण झालाच, कोरोनाची भीतीही काही प्रमाणात कमी झाली आहे. बार्शी आगारात प्रवाशांची संख्या वाढताना दिसत असून, उत्पन्न सुरू झाल्याने वाहक-चालकांसह कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बार्शी आगाराने सुरवातीला ग्रामीण भाग, सोलापूर अशी वाहतूक सुरू केल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद लाभला नाही. बसच्या फेऱ्या, प्रवाशांची संख्या, वाहक-चालक असा खर्च विचारात घेतला तर तोटाच सहन करावा लागला होता. मात्र राज्य शासनाने 19 ऑगस्टपासून आंतरराज्य बससेवेला परवानगी देताच बार्शी आगारातून पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर अशा बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, प्रवासीही बसमधून प्रवास करू लागले आहेत. यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. कोरोना संसर्गाची भीती असल्याने सध्या बसमध्ये 50 टक्केच प्रवाशांना प्रवास करता येत आहे. तरीही बससेवेच्या 23 ऑगस्टअखेर चार दिवसांत प्रवाशांची संख्या वाढतानाच दिसत आहे. 

दररोज एक हजारपेक्षा जास्त प्रवासी 
19 ऑगस्ट रोजी बससेवा सुरू झाली, त्या वेळी पहिल्या दिवशी बार्शी आगारातून 10 बस अन्‌ दोन हजार किलोमीटर सेवा देण्यात आली. तर एक हजार 32 प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये तीन दिवसांत वाढ होत रविवारी बार्शी आगाराने 22 बसच्या 73 फेऱ्यांचे नियोजन करून सात हजार 20 किलोमीटरची सेवा प्रवाशांना दिली आहे. यात एक हजार 702 प्रवाशांनी प्रवास केला असून बससेवा सुरू झाल्यापासून दररोज सरासरी एक हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहेत. प्रत्येक फेरीनंतर बस निर्जंतुक करण्यात येत असून, प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना व दहा वर्षांच्या आतील मुलांना प्रवासास अद्याप महामंडळाने परवानगी दिलेली नाही. बार्शी आगार लॉकडाउनपूर्वी सरासरी उत्पन्न लाखाच्या आकड्यात असून सोलापूर जिल्ह्यात प्रवासी वाहतूक व उत्पन्नात अग्रेसर आहे. पाच महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर वाहक, चालक, कर्मचारी, अधिकारी पुन्हा जोमाने कामाला लागले असून, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करीत आहेत. 

प्रवासी संख्या लक्षात घेऊन बस सुरू करणार
याबाबत बार्शी आगार व्यवस्थापक मोहन वाकळे म्हणाले, बार्शी आगार यापुढे लांब पल्ल्याच्या तसेच प्रवासी उपलब्ध होताच बस वाहतूक करणार आहे. चार दिवसांत प्रवाशांची संख्या वाढत असून काही प्रवासी अजून कोरोना संसर्गाच्या भीतीने दुचाकीवर प्रवास करत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याबाहेरील प्रवासी संख्या लक्षात घेऊन बस सुरू करणार आहोत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com