मागील दहा ते पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
केत्तूर (सोलापूर) : मागील दहा ते पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्याच्या (Karmala Taluka) उजनी (Ujani Dam) लाभक्षेत्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. दररोज पडणाऱ्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून, शेतात पाणी साचून राहू लागले आहे. त्याचे परिणाम केळी (Banana) पिकावर दिसू लागले आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने केळी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर काढणीस आलेल्या केळी घडावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
सध्या नवरात्र उत्सवामुळे केळीचे दर तेजीत असताना, रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उन्मळून पडल्या आहेत. रोजच पाऊस लागून राहिल्याने पिकांमध्ये तणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.
उजनी लाभक्षेत्रात ऊस पिकानंतर केळी हे मुख्य पीक घेतले जाते. रोजच पडणाऱ्या पावसामुळे तोडणीस आलेला उभा ऊस आता जमिनीवर लोळण घेण्यास सुरवात केली आहे. सततच्या जोरदार पावसामुळे काढणीयोग्य कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शेतात पाणी साचून राहिल्याने रब्बीच्या आगामी ज्वारी पेरण्याही लांबणीवर पडणार आहेत. तर पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. दररोज रात्री होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी आता मात्र धास्तावला आहे. पावसामुळे कांदा रोपे पिवळी पडू लागली आहेत तर कांदा पीक संकटात आले असतानाच आगामी कांद्याची लागवडही धोक्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.