Sugar Factory : साखर कारखान्यांमध्ये सुरु झाली दराची स्पर्धा

यंदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 sugar factory
sugar factorysakal

पंढरपूर - गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जास्तीचा ऊस मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर करणारा जिल्ह्यातील विठ्ठल कारखाना पहिला ठरला आहे.

यंदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिकचा ऊस मिळवण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊसदराची स्पर्धा सुरू झाली आहे.

राज्यात सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने २५०० रुपये दर जाहीर करून कोंडी फोडली होती. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २५५० रुपये दर करून विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मात केली. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांनी २५०० रुपयांच्या आसपास दर जाहीर केला आहे.

दरम्यान, उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणाऱ्या श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मात्र अद्याप ऊसदराची घोषणा केली नाही. पांडुरंग कारखान्याने ऊस दर जाहीर न करता गुलदस्त्यात ठेवला आहे. येत्या काळात पांडुरंग कारखाना ऊसदर जाहीर करण्याची शक्यता आहे.

ऊसदरात आघाडी घेतल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी बक्षीस योजना जाहीर करून एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदा कारखान्यांचा गाळप हंगाम जेमतेम १०० दिवस चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच कारखान्यांना चांगला ऊस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. त्यापूर्वीच पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याने जास्तीचा ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे.

शंभर टन ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती टन दहा रुपये, अडीचशे टनासाठी पंधरा रुपये, पाचशे टनासाठी २५ तर एक हजार टनासाठी ५० रुपये बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार आहेत. कारखान्याने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल कारखाना चांगला सुरु आहे.

चांगला ऊस मिळण्यास मदत

मागील वर्षीप्रमाणे यंदाही कारखान्याने सर्वाधिक २५५० रुपये दर जाहीर केला आहे. शिवाय बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. मी इतर कारखान्यांना ऊस न देता माझा शेतातील सर्व ऊस विठ्ठल कारखान्याला देणार असल्याचे उपरी येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्तात्रय माणिक नागणे यांनी सांगितले.

दुसरीकडे या बक्षीस योजनेमुळे कारखान्याला चांगला साखर उतारा मिळणारा ऊस मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला‌ फायदा होईल, असे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com