प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तालुका म्हणुन ‘या’ तालुक्याची वेगळी ओळख

Recognition of Madha taluka of Solapur district as a taluka of administrative officers
Recognition of Madha taluka of Solapur district as a taluka of administrative officers

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांचा मतदारसंघ व राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरणाचा तालुका म्हणुन माढा तालुका सर्वांना तालुका परिचीतच. परंतु कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणुनही या माढा तालुक्याची ओळख. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी स्थिती या तालुक्याची. शेती शिवाय दुसरा कोणताही मोठा उद्योगधंदा तालुक्यात उपलब्ध नाही. शिक्षण घ्यायचे म्हणले तर कोणतेही मोठे कॉलेज तालुक्यात उपलब्ध नाही. परंतु येथील युवकांनी परिस्थितीसमोर हार न मानता पाण्यावर अथवा शेतीवर अंवलबुन न राहता. येथील युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वाटचाल सुरू केली. प्रतिकुल परिस्थितीतवर मात करत त्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीतपणे यशही संपादन केले आहे. त्यामुळे अलिकडच्या काही वर्षांमधे या तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे. 
केंद्रीय लोकसेवा आयोग असो राज्य लोकसेवा आयोग अथवा इतर स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्यातील सुपूत्रांनी "उत्तुंग गगन भरारी" घेतली आहे. देशाच्या उच्चपदापासुन शेवटच्या शिपाईपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात या तालुक्यातील अनेक सुपूत्र कार्यरत असुन आपल्या 'धडाकेबाज' कामिगरीने तालुक्यासह जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी झळकावत असल्याने, अधिकार्याची खाण असलेला कारखाना अशी माढा तालुक्याची वेगळी ओळख संपुर्ण राज्यात होऊ लागली आहे. माढा तालुक्याची निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने उपळाई बुद्रूक, दारफळ (सिना), विठ्ठलवाडी, मानेगाव, उंदरगाव, माढा, कुंभेज, अकोले खुर्द, अरण तालुक्यातील अश्या अनेक गावातील युवक उच्चस्थ पदावर कार्यरत आहेत.
 नुकताच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन यात माढा तालुक्यातील युवकांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. काल जाहीर निकालामध्ये विठ्ठलवाडी येथील नितेश कदम यांची उपशिक्षणाधिकारीपदी तर निमगाव (टे) येथील आदित्य शेंडे यांची तहसीलदारपदी, कुर्डची कन्या सोनाली भाजीभाकरे यांची नायब तहसीलदार, बादलेवाडीची कन्या वर्षा कोळेकर यांची नायब तहसीलदारपदी निवड झालेली आहे. यापुर्वी या तालुक्यातून बरेच अधिकारी झालेले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत यांनी अथक परिश्रम घेत यश संपादन केले आहे.

हेही वाचा : नोकरी देता का नोकरी? पुणे, ठाणे, सोलापुरमध्ये ‘ऐवढ्या’ जणांनी कोली नोंदणी; महास्वयंमकडूनही मिळेना प्रतिसाद
स्पर्धा परीक्षा ही फक्त उत्तर भारतीय, बिहारी लोकांचीच मक्तेदारी होती, असा समज आता माढा तालुक्यातील रांगड्या मातीतील शेतकर्यांच्या पोरांनी खोटा ठरवला आहे. गेल्या दहा वर्षात झालेली जागृती आणि प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील तरूणही आपले आव्हान निर्माण करून यामध्ये यशस्वी होऊ शकतो हे तालुक्यातील युवकांनी दाखवून दिले आहे. स्पर्धा परीक्षेची चळवळ खर्यां अर्थांने माढा तालुक्यात जर कुणी रोवली असेल तर नक्कीच ओठावर उपळाई बुद्रूक हे नाव येते. शेतकरी कुटुंबातील डाॅ संदिप भाजीभाकरे यांनी एमपीएससीतुन पोलिस उपअधिक्षक पद पादाक्रांत केले.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची बहिण रोहिणी भाजीभाकरे वयाच्या तेवीसाव्या वर्षी आयएएस अधिकारी झाल्या. अन् ग्रामीण भागातील मुलीही कश्यात कमी नाहीत हे दाखवुन दिले. या दोघांचा गावातील सन्मान सोहळा बघुन गावातील इतर परिसरातील युवकांना प्रेरणा मिळाली. तेही आपल्या सारख्या ग्रामीण भागातील आहेत. मग ते होऊ शकतात मग आपण का नाही. बस्स इथुनच सुरूवात झाली अन् स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्याचा टक्का वाढला.  तामिळनाडू राज्यातील सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून रोहिणी भाजीभाकरे उल्लेखनीय कामगिरी केली असुन त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून तामिळनाडू राज्यात रजनीकांत या मराठी माणसानंतर कुणाचे नाव घेतले जात असेल तर नक्कीच रोहिणी भाजीभाकरे यांचे नाव घेतले जाते. तेथील लोकांना त्या "लेडी रजनीकांतच" वाटतात. महाराष्ट्र राज्याचा डंका त्यांनी आपल्या दिमाखदार कामगिरीने तामिळनाडू राज्यात वाजवला. सध्या त्या दिल्लीत केंद्रीय शिक्षण उपसचिव म्हणुन कार्यरत आहेत. रोहिणी भाजीभाकरे यांचे बंधु डाॅ संदिप भाजीभाकरे हे तर ग्रामीण भागातील युवकांसाठी आयडाॅल आहेत. गडचिरोलीसारख्या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात आपल्या करिअरची सुरूवात करून सध्या मुंबईच्या पोलिस उपायुक्तपदी कार्यरत आहेत. त्यानंतर या गावातून एकाचवेळी अनुक्रमे आयएएस व आयआरएस पदी शिवप्रसाद नकाते व स्वप्निल पाटील यांची निवड झाली. त्यामुळे अधिकारी घडवणारे गाव म्हणून उपळाई बुद्रूक प्रसिद्धीस आले. सध्या शिवप्रसाद नकाते हे राजस्थान राज्यातील श्रीगंगानगरचे जिल्हाधिकारीपदी तर स्वप्निल पाटील पुण्याच्या आयकर विभागाच्या उपायुक्तपदी कार्यरत आहेत. ज्या कोटा शहाराचे नाव संपूर्ण देशात अभियांत्रिकी घडवणारे प्रचलीत आहे. त्या कोटा शहाराची जबाबदारीही शिवप्रसाद नकाते यांच्याकडे होती. तर घरची परिस्थिती बेताची असताना आयआरएस झालेले स्वप्निल पाटील सध्या पुणे येथे आयकर विभागात उपायुक्त म्सणुन उत्कृष्ठ कामगिरी करत आहेत. याच गावातील प्रमोद शिंदे म्हाडाच्या उपअभियंता पदी कार्यरत आहेत.

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायची या गावातील युवकांमध्ये जणु स्पर्धांच निर्माण झाली. सध्या या गावातील श्रीकृष्ण नकाते औंरगाबादच्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तर अमरदिप वाकडे सातारा जिल्ह्यातील कराडला तहसीलदार, संजय वाकडे गडचिरोली येथे तालुका कृषी अधिकारी तर मीनाक्षी वाकडे वित्त व लेखा अधिकारी म्हणुन लातूर येथे कार्यरत आहेत. यांची प्रेरणा इतर गावातील अनेक युवकांनी घेतली.  उपळाई पासुन दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडाचीवाडी (उ.बु) येथील कवले बंधुही यात मागे राहिले नाहीत. सचिन कवले परभणीत सहायक समाज कल्याण अधिकारीपदी तर धाकटे बंधु सहायक कामगार आयुक्त मुबंई येथे कार्यरत आहेत. या गावातुन एवढे अधिकारी झाले आहेत की, युथ आयकाॅन आयएएस अधिकारी रमेश घोलप तर यांनी आपल्या भाषणातुन उपळाई बुद्रूक म्हणजे  'स्पर्धा परीक्षेची पंढरी' असा उल्लेख केलेला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी देखील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना उपळाई बुद्रुकचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे विद्यार्थ्यांना आव्हान करतात.
महाराष्ट्र राज्याची सरक्षाणांची जबाबदारी जरी कोणावर असेल तर ती माढा तालुक्यातील सुपूत्रांच्या हाती असेच म्हणावे लागेल. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळलेले व सध्या अप्पर पोलिस महासंचालक म्हणुन गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले आयपीएस अतुलचंद्र कुलकर्णी हे मुळचे अरणचे. आपल्या कर्तव्यनिष्ठ कामिगरीने त्यांनी दहशतवादाच्या प्रवाहातुन कित्येक युवकांना बाहेर काढलेले आहे. आयएएस रमेश घोलप हे मुळचे जरी बार्शी तालुक्यातील असले तरी त्यांचे बरेचसे शिक्षण त्यांच्या मामांच्या अर्थात अरण मध्येच झालेले आहे. गेली २५ वर्षांपासुन महाराष्ट्र राज्याचे युपीएससीत पहिल्या दहा मध्ये येण्याचे अधुरे असलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मान देखील माढा तालुक्यातील युवकांनेच मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वी गरीबीवर मात करत कुंभेज येथील योगेश कुंभेजकर यांनी युपीएसीच्या परिक्षेत पहिल्या दहा मध्ये येण्याचा मान मिळवला आहे. माढा तालुक्याचे नाव जगाच्या नकाक्षावर सुवर्ण अक्षरांनी कोरले. कुंभेज याच गावचे दतात्रय भडकवाड हे सध्या सिंधुदुर्ग येथे उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत आहेत. नवी मुबंईसारख्या मोठ्या महानगरपालिकेत कर उपायुक्त म्हणुन कार्यरत असलेले प्रकाश कुलकर्णी उपळाई खुर्दचे रहिवासी आहेत. रिधोर गावचे सुपूत्र (स्व) साहेबराव गायकवाड हे सध्या पुणे येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणुन कार्यरत होते. कृषी खात्याच्या पुणे विभागाच्या कृषी सहसंचालकपदी कार्यरत असणारे विजयकुमार इंगळे हे मुळचे अंजनगाव खेलोबा येथील रहिवासी आहेत. तर याच गावातील पवनकुमार चव्हाण मुबंई येथे सहायक कामगार आयुक्तपदी, प्रविण लटके नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत. माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुकच्या नंतर अधिकारी होण्यासाठी स्पर्धा सुरू असेल तर ती विठ्ठलवाडी व दारफळच्या युवकांमध्ये. विठ्ठलवाडीसारख्या छोट्याश्या गावातुन देखील बरेच अधिकारी घडले आहेत. एमपीएससीच्या परिक्षेत एकाचवेळी सचिन कदम व सोनाली कदम हे दोघे भाऊ-बहिण डिवायएसपी झाले. विठ्ठलवाडी येथे मोठ्या प्रमाणात बहुरूपी समाज असुन या समाजातील मोहन शेगर हे पहिले डाॅक्टर असुन ते सध्या सोलापूर येथे जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. संजय नागटिळक उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन यांची निवड झालेली आहे. सिना दारफळ येथील युवकांमध्ये देखील स्पर्धा परीक्षेची चुरस दिसते. अलिकडच्या दोन ते तीन वर्षांत स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला अन् इथला युवक नाही अस कधी होत नाही. एमपीएससी सिम्फ्लिफाईडच्या माध्यामातुन संपुर्ण राज्यातील युवकांच्या संपर्कात असलेले उपजिल्हाधिकारी डाॅ अजित थोरबोले यांचे हे गाव. येथील रत्नाकर नवले पोलिस उपअधिक्षकपदी तर प्रदिप उबाळे तहसीलदार म्हणुन कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेत दारफळ येथील भाऊ-बहिणीनी यश मिळवले आहे. महेश सुळे गटविकास अधिकारी तर बहिण सुप्रिया सुळे तहसीलदार म्हणुन कार्यरत आहेत. नुकतेच भारतीय अभियांत्रिकी सेवा मध्ये निरजंन उबाळे या युवकाने घवघवीत यश संपादन केले. उंदरगावचे डाॅ ज्ञानेश्वर चव्हाण हे सध्या पोलिस उपायुक्तपदी कार्यरत आहेत. आई-वडिल अडाणी असताना देखील त्यांनी चांगल्या रितीने शिक्षण पूर्ण स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली आहे. तर याच गावातील विशाल नाईकवाडे सध्या कर्जत जामखेडच्या तहसीलदारपदी कार्यरत आहेत. तर मानेगावचे क्षीरसागर कुटूंबातील अजितकुमार क्षीरसागर हे पोलिस उपअधिक्षकपदी कार्यरत असुन तर धाकटे बंधु सुजितकुमार क्षीरसागर नुकतेच पोलीस उपअधिक्षक म्हणुन उत्तीर्ण झाले आहेत. याच गावातील संजय देशमुख उपजिल्हाधिकारी म्हणुन सेवा बजावत आहेत. त्यामुळे उपळाई बुद्रुक गावची प्रेरणा विठ्ठलवाडी, दारफळ, उंदरगाव व इतर जवळच्या सर्वच गावातील युवकांनी घेतली असुन, प्रशासकीय क्षेत्रातील दमदार कामगिरीनी गावचे नाव भारताच्या नकाक्षावर सुवर्ण अक्षरांनी रेखाटले आहे.
राज्यसेवेबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देखील माढ्याची युवकांनी गरूडझेप घेतली आहे. माढ्याचे सुपूत्र विपुल वाघमारे आयआरएस म्हणुन सेवा बजावत आहेत. सामजिक बांधलिकी म्हणुन त्यांनी माढा शहरात व परिसरात वृक्ष संवर्धन महत्त सांगताना ते नेहमी दिसतात. मुक्त विद्यापीठातुन शिक्षण घेऊन बारलोणीचे महेश लोंढे आयआरएस झाले व सर्वासमोर आदर्श उभा केला. सध्या ते नाशिकच्या सहायक आयकर आयुक्तपदी कार्यरत आहेत. तर टेंभुर्णीचे अमर खुळे यांनी देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले असुन, सध्या ते मुंबई येथे सहायक आयकर आयुक्त म्हणुन कार्यरत आहेत. संपूर्ण राज्याला लेडी सिंघम म्हणुन परिचीत असलेल्या तहसीलदार शिल्पा ठोकडे या कुर्डवाडीच्या रहिवासी आहेत. निमगावचे सुपूत्र गणेश शिंदे व तुळशीचे रामलिंग चव्हाण तहसीलदार पदावर तर भेंडचे हनुमंत पाटील बारामतीमध्ये तहसीलदार म्हणुन कार्यरत आहेत, अकोले खुर्द येथील एकाच कुटुंबातील तीन भाऊ पोलीस उपनिरिक्षक झालेले आहेत. त्यातील थोरले बंधु अंकुश चिंतामण सध्या मुबंई मध्ये सहायक पोलीस निरीक्षक तर इतर दोन भाऊ पोलीस उपनिरिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. याच गावातील सूर्यकांत पाटील पोलीस निरीक्षक पदावर सेवा बजावत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एमपीएससीच्या परिक्षेत याच गावातील धनंजय पाटील यांची पोलीस उपअधीक्षक निवड झालेली आहे. व्होळे खुर्दचे रमेश चोपडे पोलीस उपअधिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. सोलापूरच्या वाहतुक शाखेच्या पोलीस उपायुक्त वैशाली शिंदे या अरणच्या रहिवासी आहेत. तर त्यांची बहिण मंदाकिनी शिंदे या ठाणेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत आहेत. याच गावातील हनुमंत भापकर औरांगाबादच्या वाहतुक शाखेच्या पोलीस उपअधिक्षकपदी पदी कार्यरत आहेत. तर जवळच असलेल्या मोडनिंबचे संजय जाधव पोलीस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. एकंदरीत पाहता या तालुक्यातील मुलामुलींना फक्त स्पर्धा परीक्षेचे वेड लागले असुन स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्याचा झेंडा दरवर्षी झळकावत आहेत.
कुणाला कशाचा वेड लागेल सांगता येत नाही म्हणतात ना ते खरच आहे. माढा तालुक्यातील युवकांना फक्त सनदी अधिकारी व्हायचेय. त्यामुळेच "मी पण प्रशासकीय अधिकारी होणारच" अशी मनाशी खुणगाठ बांधून त्या दिक्षेने वाटचाल करतात. त्यामुळेच दरवर्षी स्पर्धा परीक्षेतुन घेतल्या जाणार्यां पोलीस उपनिरिक्षक, कर निरीक्षक, आरटिओ सारख्या घेतल्या जाणार्यां परिक्षेत तालुक्यातील कित्येक तरूण उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या कानाकोपर्यांत आपली प्रशासकीय सेवा बजावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची राजधानी जरी मुबंई असली तरी, प्रशासकीय राजधानी माढा तालुकाच म्हणावे लागेल. दुष्काळी तालुका म्हणुन ओळख असलेल्या माढा तालुक्याची अलिकडच्या काळात "प्रशासकीय अधिकार्यांचा तालुका" अशी वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com